
मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू कारयन पोलार्डने अचानकपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सचा या आयपीएलमधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर गुरुवारी होणार आहे. पण या सामन्याच्या पूर्वसंध्येला पोलार्डने अचानक निवृत्ती घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. पोलार्डने आपल्या इंस्टाग्रावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये आपण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहोत, असे सांगितले आहे. पोलार्डने १२३ वनडेमध्ये २६.०२ च्या सरासरीने आणि ९४.४२ च्या स्ट्राईक रेटने २, ७०६ धावा केल्या आहेत, यामध्ये ३ शतकांसह १३ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर पोलार्डने वनडे क्रिकेटमध्ये त्याने ५५ विकेटही घेतल्या आहेत. पोलार्डने ट्वेन्टी-२० क्रिकेट चांगलेच गाजवले. पोलार्डने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १०१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५.३१ ची सरासरी राखली आहे आणि १३५.१४ च्या स्ट्राईक रेटने १५६९ रन केल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६ अर्धशतकं आहेत, तसंच त्याने ४२ बळीही मिळवले आहेत. २०१२ साली वेस्ट इंडिजने पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता, पोलार्ड त्या संघाला सदस्य होता. आतापर्यंत पोलार्ड हा आपल्या धडाकेबाज फटकेबाजीसाठी ओळखला जायचा. पण आता पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही, याचाच अर्थ पोलार्ड आता आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातही खेळू शकणार नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघासाठी हा एक मोठा धक्का असेल. कारण आयपीएलपूर्वी वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा भारतात आला होता तेव्हा पोलार्डकडे वेस्ट इंडिजचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यामुळे पोलार्डकडे ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजची निवड समिती पाहत होती. पण आता पोलार्ड ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला गेल्या सहा सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही, त्याचबरोबर या सहा सामन्यांमध्ये पोलार्डला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पोलार्डने या वाईट कामगिरीनंतर हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. पण पोलार्डने ज्यापद्धतीने अचानकपणे आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला, त्यामुळे मुंबई इंडियन्ससह सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे.