नवनीत राणा प्रकरणात महाराष्ट्रातील ४ बडे अधिकारी अडचणीत? दिल्लीत वेगवान हालचाली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 28, 2022

नवनीत राणा प्रकरणात महाराष्ट्रातील ४ बडे अधिकारी अडचणीत? दिल्लीत वेगवान हालचाली

https://ift.tt/kDaT3vY
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : हनुमान चालिसा प्रकरणी आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करून मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात अयोग्य आणि अमानवी वागणूक देत विशेषाधिकारांचा भंग केल्याच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या तक्रारीची लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने दखल घेतली आहे. या समितीने महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडेय आणि भायखळा महिला जिल्हा कारागृहाचे पोलिस अधीक्षक यशवंत भानुदास फड यांनी साक्षीसाठी १५ जून रोजी पाचारण केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठणाची घोषणा केल्याबद्दल आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करून अयोग्य वागणूक दिल्याची नवनीत कौर राणा यांनी २५ एप्रिल रोजी ई-मेलद्वारे पत्र पाठवून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती. राणा यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची दिल्लीत भेटही घेतली होती. अटकेत असताना अयोग्य वागणूक दिल्याचे राणा यांनी केलेले सर्व आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळून लावले होते. मात्र, राणा यांच्या तक्रारीची दखल घेत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्यातील या चार बड्या अधिकाऱ्यांना १५ जून रोजी संसद भवनातील विशेषाधिकार समितीच्या कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्रालयांना पत्र लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या वतीने मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीसाठी केंद्र सरकारच्या कार्मिक आणि जनतक्रार आणि पेन्शन मंत्रालयाला, तर रजनीश सेठ, संजय पांडेय आणि भानुदास फड यांच्या उपस्थितीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीपुढे पाचारण करण्यात आलेल्या चारही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीविषयी ७ जूनपर्यंत कळविण्यात यावे, असेही या पत्रात म्हटले आहे.