रत्नागिरी: कोकणात गेले काही दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने शुक्रवारी ८ जुलै रोजी काहिशी उसंत घेतली होती. मात्र आता पावसाचे पाणी मुरल्याने दरड कोसळणे, ग्रामीण भागातील वाडी वस्ती जोडणारे पूल कोसळणे अशा घटना समोर आल्या आहेत.मंडणगड तालुक्यात किंजळघर येथे घराजवळ मोठी दरड कोसळल्या आहेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी अथवा मोठी वित्तहानी झालेली नाही.पण खबरदारीचा उपाय म्हणून किंजळघर येथील तीन कुटूंबातील १६ नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून येथील सर्वेक्षण करण्यासाठी भू वैज्ञानिकांना तहसीलदार दत्तात्रेय बर्डे यांनी पाचारण केले आहे. शुक्रवारी आठ जुलै रोजी ही घटना समजताच मंडणगड तहसीलदार तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता सकपाळे व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली व कुटुंबाला धीर दिला. तस्लिम अयुब ओंबिलकर यांच्या कुटुंबातील ६ सदस्य,हसमत महमद शेख यांच्या कुटुंबातील ३, तन्वीर अयुब ओंबीलकर यांच्या कुटुंबातील ७ अशा एकूण १६ नागरीकांना सहकार्य करत यांची व्यवस्था एका शाळेत करण्यात आली होती. पण, ही सगळी तीनही कुटूंब नातेवाईक जवळच असल्याने तात्पुरते नातेवाईकांकडे शिफ्ट झाली आहेत. त्यांना सध्या पावसाळ्याच्या दिवसात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करणेसाठी सुचना तसेच नोटीसा देण्यात आल्या आहेत. मौजे किंजळघर येथे असलेल्या डोंगराला चालू अतिवृष्टीमुळे भेगा पडल्यामुळे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे तातडीने या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान या काळात या कुटूंबांना आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडुन केले जाईल अशी ग्वाही यावेळी प्रशासनाकडुन देण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जिल्हाप्रशासनाला देण्यात आला आहे. कुडावळे तेली वाडी ते काटकर वाडी साकव कोसळला इकडे दापोली तालुक्यातील कुडावळे तेली वाडी ते काटकर वाडी जाणारा पूल साकव बुधवारी रात्री कोसळला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला त्याबाबत कळवणेत आलेले असून हा साकव जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे. याचाही पंचनामा संबंधित विभागाकडुन करण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने दाभोळ जवळील भाटी येथील पार्वती महादेव लवंदे यांच्या घराची पडवी पडून घराचे अंशतः नुकसान झालेले आहे. तसेच दापोली शहरात युसुफ हमीद फकीर, कॅम्प दापोली यांची जुन्या बंद घराची भिंत पडलेने बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त घटनांचे पंचनामे तहसीलदार वैशाली पाटील यांच्या प्राशासनाकडून करण्यात आले आहेत.