
म. टा. प्रतिनिधी, मुंबई ः मुंबई क्रिकेट संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्षातील राजकारणी मंडळी एकत्र का येतात याचे खरे उत्तर आहे ते गेल्या काही वर्षांत या संघटनेकडे येणाऱ्या पैशामध्ये. जाणकारांच्या मते पुढील तीन वर्षांमध्ये मुंबई संघटनेकडे सुमारे पाचशे कोटी रुपये येणार आहेत. त्यावर ताबा ठेवण्यासाठी एरवी एकमेकांच्या विरोधात वार करण्याची एकही संधी न सोडणारे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे दोन्ही गट एकाच पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रमाणेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख यांनीही यापूर्वी सक्रिय सहभाग घेतला होता. तुलनेने भारतीय जनता पक्ष मात्र त्यापासून दूर होता. मात्र देशात व राज्यामध्ये २०१४मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपनेही या संघटनेच्या राजकारणामध्ये सातत्याने रस घेण्यास प्रारंभ केला. या वेळेस पवार व आशीष शेलार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अमोल काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मावळत्या कार्यकारिणीमध्ये ते उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आयपीएलमधून काही हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविते हे सर्वश्रुतच आहे. त्यातील निम्मा वाटा हा संघमालकांना, तर काही वाटा हा सदस्य असलेल्या राज्य संघटनांना दिला जातो. संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत बीसीसीआयकडून मुंबई संघटनेला दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये हे आयपीएलच्या नफ्यातून मिळत होते. त्याशिवाय प्रत्येक मॅच संयोजनापोटी, मॅचच्या दरम्यान स्टेडियममध्ये लावल्या जाणाऱ्या जाहिरातींपोटी तसेच तिकीटविक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाचा वाटाही संबंधित संघटनांना दिला जातो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत मुंबई क्रिकेट संघटनेला शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी बीसीसीआयकडून मिळाला आहे. पुढील तीन वर्षांमध्ये त्यामध्ये किमान तिप्पट ते कमाल पाचपट वाढ होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेच्या प्रक्षेपणाच्या हक्कांची विक्री यापूर्वीच झाली असून त्यातूनच संघटनेला दरवर्षी सुमारे शंभर कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. त्याशिवाय इतर सर्व बाबींमधून दरवर्षी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये या संघटनेमध्ये बीसीसीआयकडून मिळणारे उत्पन्नच साडेतीनशे ते पाचशे कोटी रुपयांच्या दरम्यान असेल. पवार-शेलार पॅनेलमध्ये सर्व पक्षांच्या राजकारण्यांचा समावेश आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार काळे हे भाजपसमर्थक आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विहंग सरनाईक (आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र) यांचाही पवार-शेलार गटात समावेश आहे. या व्यतिरिक्त सचिवपदासाठी अजिंक्य नाईक आणि खजिनदारपदासाठी अरमान मलिक हे रिंगणात असतील. कार्यकारिणीसाठी आव्हाड, नार्वेकर यांच्याशिवाय खोदादाद याझगर्दी, मंगेश साटम, प्रमोद यादव, सूरज सामंत, निलेश भोसले, दीपेन मिस्त्री व शफीक फारूक पटेल हे रिंगणात आहेत. संदीप पाटील यांच्या मुंबई क्रिकेट ग्रुपकडून सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, तर खजिनदारपदासाठी जगदीश आचरेकर मैदानात आहेत. या व्यतिरिक्त कार्यकारिणीसाठी सुरेंद्र शेवाळे, प्रशांत सावंत, संदीप विचारे, राजेश महंत, कौशिक गोडबोले, विघ्नेश कदम, सुरेंद्र हरमळकर, दाऊद पटेल व अभय हडप हे रिंगणात आहेत. त्याचबरोबर नियामक मंडळासाठी मलिक मर्चंट हेही लढणार आहेत. यातील बहुतेक सर्व माजी क्रिकेटपटू आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेचा कारभार हा माजी क्रिकेटपटूंच्या हाती असावा यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले, पण त्यामध्ये अनेकदा राजकारण्यांनी क्रिकेटपटूंना मात दिली आहे. यंदा संदीप पाटील व अमोल काळे यांच्यात सामना रंगत असून त्यामध्ये नक्की काय होणार याबद्दल उत्सुकता आहे. पवार-शेलार गटाचे आज स्नेहभोजन संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी पवार-शेलार गटाने वानखेडे स्टेडियमवर आज, सोमवारी रात्री स्नेहमेळावा व भोजन ठेवले आहे. कार्यकारिणीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने त्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. फडणवीसही सक्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या निवडणुकीत सक्रिय असून मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यापाठोपाठ फडणवीस यांनी अनेक मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना पवार-शेलार गटासाठी मतदान करण्याची गळ घातल्याचे समजते. विशेषकरून अमोल काळे यांची निवड एकमताने व्हावी यासाठी ते आग्रही असल्याचे समजते.