
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पाच वर्षांपूर्वी १९ एप्रिल रोजी परीक्षेला जाण्यासाठी तेजश्री वैद्य लोकलने सीएसटीच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी दारात उभ्या असलेल्या तेजश्रीचा तोल जाऊन ती मध्य रेल्वेच्या शीव व मांटुगा या रेल्वे स्थानकादरम्यानच्या नाल्यात पडली. या अपघातामध्ये तेजश्रीच्या मेंदूला जबर दुखापत झाली. तिच्या संवेदना हरपल्या. दोन महिने कोमामध्ये असलेली तेजश्री मागील पाच वर्षांपासून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धडपड करत आहे. या अपघाताच्या दिवशी तिचे कुटुंबीय दरवर्षी तिचा वाढदिवस साजरा करतात. यंदाही तसाच वाढदिवस साजरा करण्यात आला.तेजश्रीच्या अपघाताला पाच वर्षे पूर्ण झाली आहे. या वर्षांत तिच्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. हा पाच वर्षांचा काळ अत्यंत खडतर होता. मेंदूला मार लागल्यामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. हात उचलला जात नव्हता. शब्द समजत नव्हते. दृष्टीदोष निर्माण झाला होता. शरीराचा तोल सांभाळता येत नव्हता. पाय साथ देत नव्हते. पण त्या परिस्थितीमध्ये तेजश्रीच्या पालकांनी, तिच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी आशा सोडली नाही.लोकसहभागातून तिच्यावरील वैद्यकीय उपचारांचा खर्चासाठी हातभार लावला होता. तिला वैद्यकीय उपचारांसोबत वैद्यकीय पुनर्वसनाची गरज होती. त्यासाठी येणारा आर्थिक खर्च लाखांच्या घरात होता. श्रीराम वैद्य यांना माध्यमांनीही मोलाची साथ दिली. आवाहनामुळे मदतीचे लाखो हात उभे राहिले. लो. टिळक आणि रहेजा रुग्णालयांमध्ये तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. जीवावरचा धोका टळल्यानंतर तिला घरी आणण्यात आले. तेजश्रीच्या पालकांनी तिने जागेवर पडून राहू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. फिजिओथेरपीच्या मदतीने तिला हात धऱून उभे राहायला शिकवले. हातापायामध्ये त्राण यावेत यासाठी तिच्या हातापायांना मसाज सुरू केला. पाच वर्षांपासून त्यात खंड पडलेला नाही.या अपघातावर मात करून पुन्हा जिद्दीने उभ्या राहिलेल्या तेजश्रीचा हा पुनर्जन्मच असल्याची भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा दिवस तिचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, असे तिचे बाबा श्रीराम वैद्य यांनी सांगितले. तेजश्रीचे आयुष्य पूर्वपदावर यावे, यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जात आहे. अद्याप सर्व सुरळीत होण्यासाठी बराच काळ जावा लागणार आहे. पण आत्तापर्यंतच्या प्रसंगांना धीराने तोंड देण्याच्या तिच्या व तिच्या पालकांच्या सकारात्मकतेला मात्र पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. अशीच भावना तेजश्रीला पाच वर्षानंतर पाहिलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे.पत्रकारिता करण्याचे स्वप्नपत्रकारितेमध्ये करिअर करण्याचे स्वप्न तेजश्रीने उराशी बाळगले होते. पण या अपघातानंतर ती अक्षरओळख विसरली, उच्चार, शब्दांशी असलेले नाते धूसर झाले. तिने बाराखडी पुन्हा गिरवली. संगणकाच्या अक्षरांशी मैत्री केली. आजही ती स्पष्टपणे बोलत नाही. बोलण्याचा प्रयत्न करते. स्वतःचा भार इतरांवर पडू नये यासाठीही धडपडते. चॅटिंगच्या माध्यमातून भावना व्यक्त करते.