
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ३१ व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर १३ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमधील या लढतीत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघ सामन्यात टिकून राहिले. पण, अखेरच्या षटकात अर्शदीपने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे संपूर्ण खेळच बदलून गेला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावा हव्या होत्या. पण, अर्शदीपने सलग दोन चेंडूत दोन विकेट घेत पंजाबला सामना जिंकवून दिला.अर्शदीपची पहिली विकेट इतकी शानदार होती की त्याने थेट स्टंप फोडले. मुंबईसाठी फलंदाजी करत असलेले टिळक वर्माने जेव्हा हे पाहिलं तेव्हा काही काळासाठी तो चकित झाला होता. यानंतर फलंदाजीसाठी नेहाल वधेरा आला आणि पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने नेहाललाही क्लिन बोल्ड केले. दुसऱ्या चेंडूवर अर्शदीपने फक्त स्टंप फोडलाच नाही तर हवेत उडवला. हे पाहून सारेच हैराण झाले होते. असा रंगला सामनापंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी झटपट ४ विकेट्स गमावल्या. पण नंतर प्रभसिमरन आणि अथर्व तायडे सामन्याचा मोर्चा सांभाळला. पण, काहीच षटकात ते दोघेही बाद झाले. त्यानंतर आलेल्या सॅम करन आणि हरप्रीत सिंगने संघाला २०० धावांचा टप्पा गाठण्यात मदत केली. पंजाबचा कर्णधार सॅम करनने २९ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. जितेश शर्माने ४ षटकार लगावत ७ चेंडूत २५ धावा केल्या. या फलंदाजांनी शेवटच्या ५ षटकांत तब्बल ८० अधिक धावा कुटल्या. या मोठ्या खेळींसह पंजाबने २१४ धावांचा टप्पा गाठला.मुंबईकडून ग्रीन आणि चावलाने प्रत्येकी २ विकेट घेतले तर अर्जुन तेंडुलकर बेहरेनडोर्फ, जॉफ्र आर्चर यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. अर्जुन तेंडुलकरने आजच्या सामन्यात मुंबईच्या घरच्या मैदानावर पहिली विकेट मिळवली. पण मुंबईची गोलंदाजी संघासाठी भारी पडली. अर्जुन तेंडुलकरच्या एका षटकात पंजाबने सर्वाधिक ३१ धावा केल्या.मुंबईकडून खेळताना संघाचे सलामीवीर ईशान किशा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवात केली. पण, ईशान किशन १ धाव करत बाद झाला. नंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनने मुंबईचा डाव सांभाळला आणि झटपट धावा केल्या. पण रोहित शर्मा ४४ धावा करत झेलबाद झाला. नंतर ग्रीनने सूर्यकुमार यादवसोबतही झंझावाती खेळी करत संघासाठी धावा जमा केल्या. सूर्याने आजच्या सामन्यात २६ चेंडूत ५७ धावांची सहनदार खेळी केली. सूर्या आपल्या फॉर्मात परतल्याने या सामन्यात त्याने दाखवून दिले. तर ग्रीन ६७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांच्या खांद्यावर संघाची धुरा होती. डेव्हिडने षटकार चौकार लगावत सर्वांना आशा मिळवून दिली पण अर्शदीपसिंगने मुंबईच्या अशांवर पाणी फेरलं आणि तिलक वर्मा आणि नेहालवधेराला लागोपाठ क्लीन बोल्ड केले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने महत्त्वाच्या ४ विकेट्स घेतल्या. तर एलिस आणि लिविंगस्टोनने प्रत्येकी १ विकेट घेतली.