उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 3, 2023

उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

https://ift.tt/HMSGPOB
नाशिक : जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर येथील सहा वर्षांच्या चिमुरडीचा उकळत्या तेलाच्या कढईत पडून भाजल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी चिमुकली उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर चिमुकलीची मृत्यूसोबत सुरू असलेली अनेक दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच तिची प्राणज्योत मालवली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराजवळील लखमापूर येथील चिमुरडी कुटुंबासमवेत राहत होती. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी स्वयंपाक करण्याचे काम सुरु होते. याच वेळी मोठ्या कढईत शेव काढण्याचे कामही सुरू होते. चिमुरडी उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने लखमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखमापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान या खाजगी रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर तिला नाशिकमधील आज आडगाव भागात असलेल्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना १३ मार्च रोजी तिचे निधन झाले. तब्बल वीस दिवसांची तिची झुंज अयशस्वी ठरली. सहा वर्षाच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.चिमुरडी दुर्दैवानं उकळत्या तेलाच्या कढईत पडल्यानंतर भाजली गेली आणि तिला उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तिच्या उपचारात कुठलीही कमतरता भासू नये म्हणून रुग्णालयंही बदलण्यात आली. परिवाराकडून तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू होते. डॉक्टरांकडूनही वाचवण्यासाठी उपचार सुरू होते आणि चिमुकलीची देखील मृत्यूची झुंज सुरू होती. चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर हे सर्व प्रयत्न नशिबापुढे असफल ठरले असे उद्गार निघू लागले आहेत. या प्रकरणी सटाणा पोलिसांत शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरातील कुटुंब कामात व्यस्त असताना हा दुर्दैवी प्रकार घडला

अज्ञान वयात लहान मुलांना कुठल्याही गोष्टी संदर्भात माहिती नसते. त्याचा परिणाम त्यांना माहिती नसतो. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असतात . पालकांनीही आपल्याला लहान मुलांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. लखमापूर येथील दुर्दैवी घटना पाहता पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.