बारसूवरून रण पेटले! सत्ताधारी VS विरोधी पक्षांमधील राजकारण शिगेला, ठाकरे गटाचे जनआंदोलन? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 26, 2023

बारसूवरून रण पेटले! सत्ताधारी VS विरोधी पक्षांमधील राजकारण शिगेला, ठाकरे गटाचे जनआंदोलन?

https://ift.tt/wOFVuqv
म. टा. वृत्तसेवा, राजापूर\ म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड रिफायनरी उभारणीसाठी माती परीक्षणाचे काम रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ तसेच विरोधी कार्यकर्त्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या. महिलांनी यावेळी रस्त्यातच आडवे होत आंदोलन केले. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला; तरीही आंदोलक हटत नसल्याने सुमारे ११० जणांना पोलिसांनी अटक केली. आंदोलनाची धग वाढत असतानाच दुसरीकडे या प्रश्नावर सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे राजकारणही तीव्र झाले आहे.सर्वेक्षणास लागणारी यंत्रसामग्री मंगळवारी सकाळीच बारसूमध्ये दाखल झाली. मात्र अधिकाऱ्यांच्या व सर्वेक्षणाचे सामान घेऊन जाणाऱ्या गाड्या तसेच कंटेनर रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व महिला रस्त्यावरच आडव्या झाल्या. अखेर त्यांना बाजूला करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. आंदोलक महिलांना एसटी बसमध्ये बसवून रत्नागिरी पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. एकूण ११० आंदोलकांना कलम १४३, १४७,१४९,१८८,३४१ व ३७(१३/१३५)नुसार अटक करण्यात आली असून, त्यांना राजापूर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रिफायनरीविरोधी ४५ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोलवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सोमवारी रात्रीच राजापूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी रत्नागिरी पोलिस मुख्यालयात करण्यात आली आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मंगळवारी ग्रामस्थांशी चर्चा करून प्रकल्पाबाबतचे समज दूर करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आंबा बागायती क्षेत्र तसेच मच्छिमार व्यवसायावर प्रकल्पाचा दुष्परिणाम होणार नाही, याची ग्वाही दिली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार यावर अधिक चर्चा करण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञांसोबत उद्या, गुरुवारी बैठक घेण्यात येणार आहे.ठाकरे गटाचे जनआंदोलन?मुंबई : बारसू रिफायनरीबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. स्थानिक लोकांसोबत ठाम उभे राहात प्रकल्पाविरोधात कोकणात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या बैठकीत पक्षाचे खासदारही उपस्थित होते. स्थानिकांसोबत कायम राहण्याचा निर्धार करतानाच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी किंवा प्रकल्प इतरत्र स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत कुणाशी चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे स्थानिक जनतेच्या सोबत राहूनच त्याला विरोध करण्याची भूमिका घ्यावी, अशी चर्चाही या बैठकीत झाल्याचे समजते. खासदार विनायक राऊत आज, बुधवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहे. रिफायनरीला यापूर्वी कडाडून विरोध करणारे राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी मात्र आता विरोधी आंदोलनापासून दूर आहेत.