: ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने खोल खड्ड्यात पलटी होऊन त्याखाली अडकलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात तालुक्यातील वळती गावाच्या हद्दीत काटवान वस्ती परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. गुरुवार २२ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने परिसरात सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.संतोष गेणभाऊ जुंदरे (वय ४८ वर्ष) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने जुंदरे कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष गेणभाऊ जुंदरे हे स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काटवान वस्तीतून कालव्याच्या रस्त्याने घरी चालले होते. अचानक त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात त्यांचा ट्रॅक्टर पलटी झाला.संतोष जुंदरे हे ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यावेळी पाठीमागून जात असताना शेतकरी शिवाजी किसन लोखंडे यांनी हे पहिले. त्यांनी तातडीने स्थानिक शेतकऱ्यांना तेथे बोलावून घेतले. जुंदरे यांना ट्रॅक्टरच्या खालून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत संतोष यांचा मृत्यू झाला होता.यावेळी वळती गावचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे यांना घटनेची खबर देण्यात आली. त्यानंतर मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक शेखर भोईर, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश दळवी, पोलिस पाटील प्रकाश लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत संतोष जुंदरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कमावता पुरुष गेल्याने जुंदरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.