म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता मंगळवारी वाढली. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत आहे. या प्रणालीसोबतच अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत किनारपट्टी भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे क्षेत्रही महाराष्ट्राजवळ प्रभावशाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून हा जोर २८ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारसाठी आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी पालघर, ठाण्यासह मुंबईतही ऑरेंज अलर्ट कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकेल. ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण होणे, वाहतुकीला अडथळा, रेल्वे मार्ग पाण्याखाली बुडणे अशा स्थितीलाही तोंड द्यावे लागू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. घाट परिसरामध्ये पावसामुळे मातीची पाणी शोषून घेण्याचीही क्षमता संपली आहे त्यामुळे दरड कोसळणे, माती वाहून येणे यांसारखे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे पाऊस अनुभवण्यासाठी घाट परिसर, दक्षिण कोकणामध्ये फिरायला जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.राज्यातील प्रमुख ठिकाणांचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)महाबळेश्वर - १०१मुंबई (सांताक्रूझ) - २०कोल्हापूर - १२सोलापूर - २०रत्नागिरी - ३४धाराशिव - ४५छत्रपती संभाजीनगर - २१नागपूर - ३४