म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर कोणासोबत बसतात हे मी विधानसभेत गेलो तेव्हा बघितले. त्या सर्वांचे चेहरे काळे पडले होते. मुख्यमंत्री अलीबाबा असून, महाराष्ट्र लुटत आहेत. त्यामुळे या सर्व चाळीस जणांना घरी बसवायची शपथ मी घेतली आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा सेनाप्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर शनिवारी येथे केला.‘हा ३१ वर्षांचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार आहे. एकटा जरी राहिलो, तरीही चाळीस जणांना घरी बसवणारच, असा इशारा देतानाच, ‘इनके पास गाडी है, बंगला है, मेरे पास जनता है’ असा ‘दीवार’ चित्रपटातील डायलॉग मारत आदित्य यांनी शिंदेसेनेला आव्हान दिले. नाशिकमधील संवाद मेळाव्यात ते बोलत होते. शपथविधीनंतर एक गद्दार निरोप पाठवत होता, ‘एकटे कशाला लढत आहात, कोणासाठी लढत आहात? आमच्यासोबत या, लाल दिवा आहे, मंत्रिपद आहे. मी सांगितले, की माझ्याकडे जनता आहे. महाराष्ट्राची माती आहे. महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी करणार नाही.’आगामी काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला शिवसेना सांगायची आहे. मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक म्हणूनच लढतो, जनता म्हणून आपण एकत्र येऊ. निवडणुका व्हायच्या तेव्हा होतील, पुन्हा एकदा स्वच्छ राजकारण आणायचे आहे. चाळीस गद्दारांना निवडून आणण्यासाठी आधीच्या निवडणुकीत आपण आशीर्वाद दिला, ठाकरे कुटुंबीयांनी त्यांना आपलंस मानलं, तुम्ही सगळेदेखील ठाकरे आहात, तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं, पण, आता नाही, त्या आमदारांच्या राजकारणावर बुलडोझर चालवावाच लागेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. -४० मधून नऊ मंत्री झाले, बाकीच्यांचे काय?-आता आपण इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत-महाराष्ट्र आता दिल्लीसमोर झुकत आहे-आम्हाला फोडाफोडीचे राजकारण जमत नाही-घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीत गेले आहेत-मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे-आदिवासी, शेतकरी यांचा आवाज एकणारे कोणी नाही