कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरपासून ३५ किलोमीटर दूर असलेल्या उन्नाव जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. चारही महिला आहेत. कानपूरमधील रुग्णालयात कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेऊन कुटुंबीय उन्नावला निघालं होतं. त्यावेळी रस्त्यात त्यांच्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला.उन्नाव जिल्ह्यात मौरावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. इथे राहणाऱ्या एका वृद्धाचं प्रदीर्घ आघारानं कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात निधन झालं. २८ जुलैच्या सकाळी त्याचं कुटुंब पार्थिव घेऊन आपल्या गावी निघालं. तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मृत व्यक्तीची पत्नी आणि ४ मुली रुग्णवाहिकेत होत्या. कानपूर-उन्नावच्या दरम्यान रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनानं धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की मृताची पत्नी आणि तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी पोहोचले. जखमी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची अवस्था गंभीर असल्यानं तिला कानपूरला शिफ्ट करण्यात आलं. मृत धनीराम यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी नेण्यात येत होतं. रुग्णवाहिकेत त्यांची पत्नी सविता आणि चार मुली होत्या. सविता आणि तीन मुली अपघातात मृत्यूमुखी पडल्या. तर चौथी मुलगी सुधा अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे.