वैभव भोळे, रायगड : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीमध्ये घडलेली दुर्घटना इतर वस्तींवर समजलीच नव्हती. मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास पोलिस व रुग्णवाहिका आल्याने या दुर्घटनेची वर्दी इतर वस्त्यांवर मिळाली. रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली, त्यावेळी पाऊस कोसळत होता. या वाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवरील पहिल्या वाडीमध्ये काही जण झोपी गेले. साडेबाराच्या सुमारास पोलिस आणि रुग्णवाहिका आल्या, तेव्हाच अनेकांच्या मनात शंका आली. चौकशीनंतर वरच्या वाडीवर दरड कोसळल्याचे त्यांना समजले आणि खालच्या वाडीत घबराट पसरली. वरून पाऊस कोसळतोय आणि मिट्ट काळोख अशा परिस्थितीत नातेवाईकांची शोधाशोध सुरू झाली होती. वाडीवरील काही तरुण पायथ्याशी असलेल्या शाळेत रात्री झोपायला आले होते. त्यांनाही आवाज आल्याने ते वाडीकडे पळाले. मासेमारी व शेताच्या कामासाठी गेलेली कमावती काही मंडळी रात्रीची बाहेरच थांबल्याने त्यांचे प्राण वाचले. ज्या आदिवासी वाडीजवळ धनिकांनी जमिनी घेतल्या आहेत, तेथे रस्ता तयार करण्यात आला आहे. आदिवासी विकास नावाखाली हा खर्च करण्यात आला आहे. खालच्या वाडीवरून घटनास्थळी जाण्यास पायवाट आहे. स्थानिक, पोलिस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सह्याद्री, यशवंती हायकर्ससारख्या संस्थांनी तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने जिवाची पर्वा न करता दरडीखालून जखमींना काढले व उपचारांसाठी गडावरून खाली आणले. मातीचे ढिगारे काढण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कामगारांचे पथक अवजारांसह दुपारनंतर घटनास्थळी पोहोचले. सुमारे ७००हून अधिक जण मदतकार्यात सहभागी होते. जेसीबी नेण्यासाठी हेलिकॉप्टर सज्जइर्शाळवाडी येथील दरडग्रस्तांच्या सेवेसाठी जेसीबी यंत्र घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर मुंबईच्या सांताक्रूझ हवाई तळावर सज्ज आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. ‘मुंबईत तैनात असलेल्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची जेसीबी वाहून नेण्याची क्षमता नाही. जेसीबीचे भाग सुट्टे करून ते वाहून नेता येतील. पण त्यामध्ये हवामानाचा अडथळा आहे. संबंधित अपघात क्षेत्र हे दुर्गम डोंगरी भागात आहे. त्यातून सध्या ढगांनी वेढलेले आहे. या स्थितीत हेलिकॉप्टर उंचीवर नेणे धोकादायक ठरते. तरीही हवामानात सुधारणा होताच हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास वैमानिक सज्ज आहेत. संबंधित जेसीबीचे भाग डोंगरभागात उतरवून पुन्हा जोडणी करणारे कारागीरही तेथे पोहोचणे आवशयक आहे.