'सरसकट' प्रमाणपत्रे द्या; वंशावळीबाबतच्या शब्दाला आंदोलकांचा आक्षेप, उपोषण सुरुच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 8, 2023

'सरसकट' प्रमाणपत्रे द्या; वंशावळीबाबतच्या शब्दाला आंदोलकांचा आक्षेप, उपोषण सुरुच

https://ift.tt/8wqL3eJ
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : निजामकालीन महसुली किंवा शैक्षणिक अभिलेख्यात मराठवाड्यातील मराठा समाजाच्या वंशावळीत कुणबी अशी नोंद असल्यास त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी जारी केला. बहुतांश लोकांकडे वंशावळीची कागदपत्रे नसल्याने ‘सरसकट’ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावी अशी दुरुस्ती शासन निर्णयात करावी अशी मागणी करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार हरिभाऊ बागडे, भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी शिष्टाई करूनही जरांगे यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला आहे.सरकारच्या प्रतिनिधींची भेटअंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन पुराव्यात कुणबी नोंद असल्यास प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी माजी न्यायामूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती पुरावे पडताळणी करून राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. या शासन निर्णयाची प्रत आणि जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्र सोबत घेऊन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी जरांगे यांची भेट घेतली.चर्चा निष्फळअर्जुन खोतकर यांनी शासनाचा निर्णय जरांगे यांना सांगितला. मात्र, जरांगे यांनी निजामकालीन पुराव्याच्या नोंदीवर आक्षेप घेतला; तसेच ‘वंशावळ’ शब्द वगळावा आणि ‘सरसकट’ शब्द समावेशाची दुरुस्ती शासन निर्णयात करावी, अशी मागणी केली. त्यामुळे खोतकर यांच्यासोबतची चर्चा निष्फळ ठरली. ‘महाराष्ट्रातील मराठा समाजाची मूळ मागणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. त्यासाठी समाज शांततेत आंदोलन करीत आहे. शासनाचा निर्णय सर्वांना मान्य आहे. वंशावळ शब्दात सुधारणा करा. हा शासन निर्णय आमच्या भविष्यासाठी आहे. आम्ही आंदोलन लावून धरत नाही; पण त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. आमच्यावर द्वेषापोटी गुन्हे दाखल केले आहेत. आम्हीच मार खाल्ला आणि आमच्यावर गुन्हे दाखल आहेत,’ असे जरांगे म्हणाले.जरांगेंना भेटण्यासाठी रिघमनोज जरांगे यांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोकांची रिघ लागली आहे. अंतरवाली गावाच्या परिसरातही आंदोलने सुरू आहेत. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावात अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार हरिभाऊ बागडे यांनी जरांगे यांची भेट घेतली. मात्र, जरांगे यांनी शासन निर्णयात बदल होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अध्यादेशाचे मराठा समाज स्वागत करीत आहे; परंतु आमच्याकडे वंशावळीचे दस्तावेज नसल्याने आम्हाला फायदा होणार नाही. आम्ही सरकारची अडवणूक करीत नाही. अडवणूक प्रशासनाकडून होत आहे. शासन निर्णयात सुधारणा होईपर्यंत उपोषण सुरू राहील.- मनोज जरांगे, आंदोलक