भरपाई देणार असाल तर सांगा, नाहीतर रामराम! बांधावर गेलेल्या पालकमंत्री भुसेंना शेतकऱ्यांचे खडेबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 28, 2023

भरपाई देणार असाल तर सांगा, नाहीतर रामराम! बांधावर गेलेल्या पालकमंत्री भुसेंना शेतकऱ्यांचे खडेबोल

https://ift.tt/1lx0saN
म. टा. वृत्तसेवा, निफाड : ‘साहेब, अभ्यास करतो, समिती नेमतो हे काही सांगू नका. आम्ही वैतागलोय. भरपाई देणार असाल तर सांगा, नाहीतर रामराम!’ अशा शब्दांत गारपिटीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना खडेबोल सुनावले. पालकमंत्री भुसे यांनी कसबे व मौजे सुकेणे शिवारातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली, यावेळी शेतकरी भारत मोगल आपत्तीग्रस्तांची बाजू मांडताना अगतिक झाले होते.तालुक्यात रविवारी झालेला वादळवारा, पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या द्राक्षबागांच्या नुकसानीची भुसे यांनी सुकेणे परिसरात, तर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रौळस पिंपरी भागात पाहणी केली. शासकीय कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर, निफाड, उगाव, शिवडी, पिंपळगाव, ओझर, दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपळस या भागात गारपीट व अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांसह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी कसबे सुकेणे येथील संतोष भंडारे, भारत मोगल यांच्या द्राक्षबागांची, तर महेश भंडारे यांच्या कांदा पिकाची पाहणी भुसे यांनी केली.अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे भुसे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, दिलीप मोरे, सरपंच आनंदराव भंडारे, ग्रामसेवक रवी अहिरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.डोळ्यांत तरळले अश्रू...पीक हातात येण्याची वेळ आली असताना क्षणात डोळ्यांसमोर स्वप्नांचा चुराडा झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गहिवरून आले. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांनी या काळात धीर धरून स्वत:ला सावरावे, असे आधार देऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन दिले.