
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणे आणि भूमिकांमध्ये बदल होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपेतर पक्षांच्या 'इंडिया' आघाडीतील समीकरणेही बदलू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी होणारी 'इंडिया' आघाडीची प्रस्तावित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक २० डिसेंबरच्या आसपास होऊ शकते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विविध कारणांवरून बुधवारी बैठकीला येण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार होती. मात्र ती पुढे ढकलल्यानंतर आता संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनामध्ये आज, बुधवारी सकाळी 'इंडिया'च्या खासदारांची 'अनौपचारिक समन्वय बैठक' होणार आहे. आघाडीचे संसदीय पक्षनेते त्यात सहभागी होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी दोन हात करण्यासाठी २६ विरोधी पक्षांनी 'इंडिया' आघाडी स्थापन केली आहे. पाटणा, बेंगळुरू आणि मुंबई येथे आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने बोलावलेल्या दिल्लीतील प्रस्तावित बैठकीला नितीशकुमार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तर अखिलेश यादव यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे येऊ शकणार नसल्याचे कळविले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन हे राज्यातील चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. ममता बॅनर्जी यांचे निकालांनंतरचे सूर वेगळे आहेत. दिल्लीच्या बैठकीचे निमंत्रण आपल्याला मिळालेलेच नाही व आता ते मिळाले तरी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. ममता यांनी स्वतंत्रपणे अनेक प्रादेशिक पक्षनेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त आहे. 'फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीने काही होत नाही. विरोधकांना ठोस रणनीती आखावी लागेल आणि जमिनीवर उतरून काम करावे लागेल', अशी ममता यांची भूमिका आहे. जर समन्वयाने व सर्व राज्यांत योग्य जागावाटप झाले तर २०२४ मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही, असेही त्यांचे मत आहे. 'तृणमूल काँग्रेसच भाजपच्या विरोधात गेली अनेक वर्षे धैर्याने लढत आहे आणि प्रत्येकवेळी त्यांच्याविरुद्ध जिंकत आहे. त्यामुळे भाजप विरुद्धच्या या लढ्यात यशस्वी ठरणाऱ्या आणि अनुभवी पक्षनेतृत्वालाच आघाडीवर ठेवणे ही काळाची गरज आहे', असे तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने संसद परिसरात सांगितले.चर्चेच्या मागणीसाठी बैठकसंसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने आणलेली विधेयके, महागाई, तपास यंत्रणांचा दुरुपयोग, मणिपूरमधील हिंसाचार, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सीमेवरील परिस्थिती, वाढती बेरोजगारी आणि सार्वजनिक हिताच्या इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चेची मागणी करण्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी खर्गे यांच्या दालनामध्ये मंगळवारी चर्चा करण्यात आली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकचे थिरुची सीवा, आपचे राघव चड्ढा आणि सपाचे एस टी हसन आदी नेते सहभागी झाले होते.Read And