
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगाने सुरू असून चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीअखेर (जुलै ते सप्टेंबर) जीडीपी वाढून ७.६ टक्के झाला आहे. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये वेगवान वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था हे बिरुद भारतीय अर्थव्यवस्थेने कायम राखले आहे. वस्तूनिर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग), खाणकाम आणि सेवा या क्षेत्रांनी दमदार कामगिरी केल्यामुळे जीडीपी उंचावला आहे. ही माहिती गुरुवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली.मागील आर्थिक वर्षात (२०२२-२३) जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ६.२ टक्के नोंदवला गेला होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सांगितल्यानुसार, कृषी क्षेत्राच्या स्थूल मूल्यामध्ये (जीव्हीए) घसरण होऊन ते मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या २.५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा १.२ टक्के नोंदवले गेले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २०११-१२ हे आर्थिक वर्ष आधारभूत धरल्यास, वास्तविक (रिअल) जीडीपी दुसऱ्या तिमाहीअखेर ४१.७४ लाख कोटी रुपये आहे. हा जीडीपी मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ३८.७८ लाख कोटी रुपये नोंदवला गेला होता. यामुळे यावर्षी जीडीपी वाढून ६.२ टक्क्यांच्या तुलनेत ७.६ टक्के झाला आहे.