https://ift.tt/UpazJL1
महेश पाटील, नंदुरबार: सातपुड्यातील धडगाव आणि मोलगी येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची आमचूर उत्पादन करणारी बाजारपेठ आहे. मागील महिन्यातच नंदुरबारची मिरची आणि सातपुड्यातील आमचूर या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांना जागतिक पातळीवर भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. त्यामुळे आमचूरला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना मागील वर्षाच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यातच यंदा हे उत्पादन ३० टक्के घटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. आमचूर उद्योगाला दोन तालुक्यात चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली तर येथून होणारे स्थलांतर थांबण्यात मदत होईल. देशात राज्यातील छत्तीसगड जिल्ह्यात जगदलपूर, रायपूर, संबलपूर ही आमचूरची प्रथम क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि मोलगी आमचूरसाठी देशात प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांमधील अनेक ठिकाणी आमचूरची खरेदी केली जाते. चवदार खाद्यपदार्थ तसेच औषध निर्मितीसाठी आमचूरची खरेदी केली जाते. त्यामुळेच सातपुड्यातील आमचूरला मोठी मागणी असते. या ठिकाणी आमचूर खरेदी करण्यासाठी देशभरातील व्यापारी येत असतात. सातपुड्यातील आमचूर दिल्ली, जयपूर, इंदोर, अहमदाबाद, मुंबई व छिंदवाडा आदी ठिकाणी रवाना होतो.
असे तयार होते आमचूर
धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात डोंगराळ व दुर्गम भाग मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या ठिकाणी असलेले आदिवासी बांधव हे आंबे झाडावरून काढून साल हाताने कापल्यावर ते सुकवली जाते. त्यानंतर बाजारात विक्रीसाठी नेले जाते. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार मिळत असतो. दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये आमचूरच्या विक्रीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठ गजबजल्या आहेत. धडगाव आणि मोलगी या दोनच बाजारपेठेत आमचूरची विक्री होते. यात रोज शेकडो क्विंटल आमचूर विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
मागील वर्षाच्या तुलनेत भाव झाले कमी
अवकाळी पावसासह विविध समस्यांमुळे यंदा उत्पादनात जवळपास ३० टक्के घट झाली. त्यातच देशातील इतर भागात आमचूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने मागील वर्षी आमचूरला १५० पासून ३२० रु. प्रतिकिलो भाव मिळाला होता होता. यंदा मात्र ७० ते २६० प्रति किलो भाव मिळत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये मोठी नाराजी असून सातपुड्याचे अर्थकारण काहीसे बिघडले आहे. जेवढी परिपक्व कैरी तेवढी आमचूरला सफेदी अधिक असते. या सफेदीनुसार आमचूरला भाव मिळतो. गेल्या तीन वर्षाचा तुलनेत यंदा आमचूरला सर्वात कमी दर मिळाला आहे. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांत आमचूर व्यवसायात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. परंतु या संधीचा फायदा व्यापारी आणि आमचूर प्रक्रिया उद्योगाधारीत कंपन्या घेतात.
मिरची आणि आमचूरला भौगोलिक मानांकन
नंदुरबारची मिरची आणि सातपुड्यातील आमचूर या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांना जागतिक पातळीवर भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. त्यामुळे आमचूरला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना मागील वर्षाच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यातच यंदा हे उत्पादन ३० टक्के घटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. या मानांकनामुळे या दोन्ही मसाल्यांना जगभरात कुठेही विकता येईल. मानांकनामुळे जगभरात मागणी वाढली, तर या पदार्थांना भावही चांगला मिळेल. त्यातून उत्पादन वाढण्यास मदत आणि उत्पादकांना आर्थिक लाभ होईल. मात्र शासनाने आमचूर बाबत विविध घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात स्थानिक शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विक्री करावा लागत आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आमचूरला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली तर या दोन तालुक्यातून होणारे मोठे स्थलांतर थांबण्यास मदत होईल.