Jasprit Bumrah याचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 10, 2025

Jasprit Bumrah याचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah याचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. टीम इंडियाने त्यानंतर टी 20I मालिकेतही विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कटकमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय साकारला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 80 धावाही करता आल्या नाहीत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचं 12.3 ओव्हरमध्ये 74 रन्सवर पॅकअप केलं. या सामन्यात भारताच्या 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. जसप्रीत बुमराह याने या दरम्यान पहिली विकेट घेत इतिहास घडवला. टीम इंडियासाठी शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. तर अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह या चौघांनी दक्षिण आफ्रिकेच्या 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

बुमराहचं ऐतिहासिक ‘शतक’

जसप्रीत बुमराह याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. बुमराहने डेवाल्ड ब्रेव्हीस आणि केशव महाराज या दोघांना 11 व्या ओव्हरमध्ये मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने डेवाल्डला आऊट करत महारेकॉर्ड केला. बुमराहची डेवाल्ड टी 20I क्रिकेटमधील 100 वी शिकार ठरली. बुमराह यासह टेस्ट, वनडे आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

बुमराहने 81 सामन्यांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराह टी 20I क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरला. अर्शदीप सिंह टी 20I क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.

बुमराह पाचवा गोलंदाज

बुमराहने आतापर्यंत क्रिकेट कारकीर्दीत कसोटीत सर्वाधिक 234 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बुमराहने वनडेत 149 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच बुमराह तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा एकूण पाचवा गोलंदाज ठरला आहे. याआधी लसिथ मलिंगा, टीम साऊथी, शाकिब अल हसन आणि शाहीन अफ्रिदी या चौघांनी अशी कामिगिरी करुन दाखवलीय.

बुमराहचं ऐतिहासिक शतक

हार्दिक पंड्या मॅन ऑफ द मॅच

दरम्यान ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. हार्दिकने या सामन्यात 1 विकेट्स घेण्यासह टीम इंडियासाठी सर्वाधिक धावाही केल्या. हार्दिकने अर्धशतक झळकावलं. टीम इंडिया अडचणीत असताना हार्दिकने मिडल ऑर्डरमधील सहकाऱ्यांसह छोटेखानी भागीदारी केली. हार्दिकने या सामन्यात 28 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 59 रन्स केल्या. हार्दिकच्या या कामगिरीसाठी त्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरव करण्यात आला.