
क्रिकेट चाहत्यांना ज्याची भीती होती अखेर तेच झालं आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा अखेर पावसामुळे नाईलाजाने रद्द करण्यात आला आहे. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे चेस्टर ली स्ट्रीटमधील रिव्हरसाईड ग्राउंड स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पहिला डाव आटोपल्यानंतर जोरदार पाऊस आला. काही मिनिटं पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता. पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच होती. त्यामुळे नाईलाजाने उभयसंघातील सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी लागली. बीसीसीआयने उभयसंघातील पहिला सामना रद्द करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. टीम इंडियाचा या मैदानातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली.
सामन्यात काय झालं?
टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे भारताला 189 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे इंग्लंड 190 धावांचा यशस्वी पाठलाग करणार की टीम इंडिया या धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा लागून होती. पहिला डाव आटोपल्यानंतर चाहत्यांना इंग्लंडच्या बॅटिंगची प्रतिक्ष होती. मात्र जोरदार पाऊस बरसायला लागला. त्यामुळे अखेर काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.