
महाराष्ट्रात आजपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशचतुर्थीचा आज पहिला दिवस आहे. सकाळपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची सुद्धा मनोभावे पूजाअर्चा सुरु आहे. अनेकांची बऱ्याच दिवसांपासून घरगुती गणपतीसाठी तयारी सुरु आहे. आज तो दिवस आला आहे. मुंबईतील चाकरमनी, नोकरदार वर्ग गणपतीसाठी गावी गेला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण या भागातही गणेशचतुर्थीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. काल मुंबापुरीला पावसाने झोडपून काढलं. पण गणेशचतुर्थीचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. मागच्या बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. गणरायाने पावसाची चिंता मिटवावी हीच सर्वांची प्रार्थना आहे.