Manoj Jarange: लढाई आता अंतिम टप्प्यात… मनोज जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 12, 2026

Manoj Jarange: लढाई आता अंतिम टप्प्यात… मनोज जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

Manoj Jarange: लढाई आता अंतिम टप्प्यात… मनोज जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

विवेक गावंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आरक्षणातील कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. हायकोर्टाने कालच परवानगी शिवाय मुंबईत आंदोलन न करण्यास बजावले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदूच्या सणादरम्यान शिवरायांचे मावळे आंदोलन करणार नाहीत, अशी भावनिक साद घातली आहे. त्याचवेळी आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार असल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावले आहे. या सरमिसळमध्ये मुंबईच्या दिशेने जरांगेंची पावलं पडणार की ते सबुरीनं घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज आंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची बैठक होत आहे. त्यात काय निर्णय होतो हा सध्या कळीचा मुद्दा आहे.

जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम

आम्ही कायद्याला धरून अर्ज केला. परवानगीची जबाबदारी सरकारची आहे. सरकार स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजत आहे. न्यायालयापेक्षा मोठे समजत आहे. संविधानाचे उल्लंघन करत आहेत. आता सरकारने सुद्धा नियम पाळले पाहिजेत. सरकार परवानगी देईल आणि आझाद मैदानावर उपोषण सुद्धा होईल असे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला. पण आजच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे.

मनोज जरांगे यांची आज राज्यव्यापी बैठक

लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. घरी बसू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर आंतरवाली सराटीत गर्दीचा ओघ सुरू झाला आहे. आज आंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक होत आहे. दुपारी 12 वाजता बैठक असेल. त्यात मुंबईतील आंदोलनाची रुपरेषा जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ज्या मागण्या जरांगे यांनी केल्या, त्याला सरकारच्या वतीने काय प्रतिसाद देण्यात आला, यावरही चर्चा होईल.

राधाकृष्ण विखे पाटील यांची नो कमेंट

अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मुद्द्यावर अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलणं टाळलं. आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता, “आज टंचाईची बैठक आहे, टंचाईवरच बोलू,” असं म्हणत त्यांनी विषय बदलला. मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई कूचच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

आंतरवाली सराटीत स्वच्छता मोहीम

आंतरवलीतील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन स्थळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले स्वयंसेवक आंदोलनस्थळी झाडलोट करताना पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच स्वच्छता मोहीम सुरू झाली असून आंदोलन स्थळी सडा रांगोळी काढण्यात येत आहे.