मुंबई: 'सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच 'आमचेच सरकार येणार' असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत', असा खडा सवाल करतानाच, 'श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,' असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी भाजपला दिला आहे. भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री यांनी राज्यात भाजपचं किंवा भाजपसोबतच सरकार येणार, असं वक्तव्य केलं होतं. 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. उद्धव यांनी भाजपला '१०५' वाले म्हणून हिणवलं आहे. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआडून घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे आता उघड झाले आहेत, असा थेट आरोप उद्धव यांनी केला आहे. काय म्हणतात उद्धव ठाकरे? >> राज्यात नवी समीकरणं जुळून येत असल्यानं अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. नवं सरकार सहा महिन्याच्या वर सरकार टिकणार नाही असं भविष्यही वर्तवलं जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो. स्वत:चे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. >> आपण महाराष्ट्राचे मालक आणि देशाचे बाप आहोत असं कुणाला वाटत असेल तर त्या खुळ्या मानसिकतेतून बाहेर पडा. अन्यथा मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने प्रवास सुरू होईल. कालच्या राज्यकर्त्यांना लोकांनी वेडे ठरवावे हे आम्हाला बरे वाटत नाही.
>> 'पुन्हा आमचेच सरकार' अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील आणि किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. आम्हाला याची चिंता वाटते. >> राजकारणात ज्यांच्याकडून निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा असते ते 'पंच' फुटल्यावर पराभवाच्या टोकास गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच. 'पुन्हा आमचे सरकार' हा आत्मविश्वास त्यातूनच जागा झाला असेल. पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. जनता ती तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही. >> स्वत:स जगज्जेते म्हणवून घेणारे नेपोलियन, अलेक्झांडरसारखे योद्धेही आले आणि गेले. श्रीरामालाही राज्य सोडावे लागले. औरंगजेबही शेवटी याच भूमीत गाडला गेला. तेव्हा अजेय असल्याच्या गमजा का मारायच्या? त्यामुळं इतके मनास लावून घेऊ नका. जगात अजिंक्य कुणीच नाही हेच सत्य आहे.
https://ift.tt/2KugFtM