नवी दिल्ली: शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, ही काँग्रेसची अट शिवसेनेने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे शिवसेनेती केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे. आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत भाजपने महाराष्ट्रात फारकत घेतलीच आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडत अरविंद सावंत यांनी युती तोडल्याचा दोष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
https://ift.tt/2Q3GK6j