मुंबईः बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. यातून भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला, असा घणाघात शिवसेनेने भाजपवर केला आहे. शिवसेनेने भाजपसह त्यांच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून हा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख टाळत शिवसेनेने निशाणा साधलाय. आता सर्व शुभ घडेल!, असंही नमुद केलंय. बहुमताचा आकडा नसतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, हा पहिला गुन्हा व ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुन्ह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जेथे संविधानाचे रक्षण व्हावे त्या संविधानाच्या संरक्षकांनीच या गुन्ह्यांस कवच दिले. त्यामुळे आज ज्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचे ढोंग केले त्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. महाआघाडीच्या १६२ आमदारांनी देशाच्या जनतेसमोर येऊन एकजुटीचे प्रदर्शन केले. यामुळे भाजपच्या बहुमताच्या दाव्याची हवाच निघून गेली, अशी खिल्ली शिवसेनेने उडवली आहे. अजित पवारांशी त्यांनी पाट लावलेली चालते. पण त्यावर पलटी मारून काय मिळवले? सत्तेची लाचारी नसती व दिलेल्या शब्दास जागण्याची इच्छा असती तर ही वेळ भाजपवर आली नसती. तुम्ही खोटे बोलतात व शिवसेनेला खोटे पाडण्याचा प्रयत्न केलात. त्यामुळे महाराष्ट्राचे स्थैर्य व स्वाभिमान यासाठी आम्ही तीन पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी २०१४मध्ये भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता तेव्हा लाचारी नव्हती. मग आता लाचारी कसली? भाजपचे वैफल्य असे की इतर राज्यांत जे करू शकले ते त्यांना महाराष्ट्रात घडवता आले नाही. महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने पाणी दाखवले. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अकतिक का व्हावे? असा सवाल शिवसेनेनं केलाय.