उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह

https://ift.tt/373ql82
मुंबई: काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या नव्या महाआघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळणार हे निश्चित झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण, यावर खल सुरू झाला आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनीच भूषवावे, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे, असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

भाजपला वगळून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार येणार हे आता निश्चित झालं आहे. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळणार आहे. या पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई व विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ठाकरे यांच्याखेरीज अन्य नेत्याच्या नावावर एकमत होणार नाही, असं शिवसेनेच्या एका आमदारानं सांगितलं. सत्तास्थापनेच्या दृष्टीनं काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये उद्धव यांच्याच नावाला पसंती देण्यात आली. स्थिर सरकार द्यायचं झाल्यास उद्धव यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असं आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला कळविलं असल्याचं एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री द्यायचं की पाच वर्षे हे आघाडीच्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाही. उद्धव यांनी सरकारचं नेतृत्व करावं, यावर आघाडीचा अधिक भर राहणार असल्याचं कळतं. उद्धव अनिच्छुक, आदित्य अस्वीकारार्ह आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असले तरी ते स्वत: हे पद घेण्यास इच्छुक नसल्याचं कळतं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं करण्याचा पर्याय शिवसेनेपुढं आहे. मात्र, वय आणि अनुभवानं लहान असलेल्या आदित्य यांचा पर्याय काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य होण्यासारखा नाही. आघाडीकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री व अजित पवार, छगन भुजबळ असे उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले आमदार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत काम करावं लागणार असल्यानं उद्धव यांनाच त्यांचं प्राधान्य आहे.