नवी दिल्ली दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा सद्या गाजत असताना राजधानीतील प्रदूषणाला चीन आणि पाकिस्तान जबाबदार असल्याचा जावाई शोध भाजप नेत्याने लावला आहे. 'आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारील राष्ट्राने विषारी वायू सोडला असावा, त्यामुळे दिल्लीतील हवा प्रदूषित झाली असावी, असं विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल यांनी केलं आहे. दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्लीतील शाळांना सुटी देखील देण्यात आली आहे. तर वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा अतिशय गंभीर होत असताना भाजप नेत्याने यासाठी थेट पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलंय. पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. भीकेचा कटोरा घेऊन पाक जगभर फिरतोय. याच पार्श्वभूमीवर भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाक प्रयत्न करतोय, असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अग्रवाल यांनी हे विधान केलं आहे. विनीत अग्रवाल हे भाजपच्या उत्तर प्रदेश व्यापार विभागाचे संयोजक आहेत. त्यांनी याआधीही अशी खळबळजनक विधानं केली आहेत. 'सध्या जवळपास अर्ध्या देशात विषारी वायू पसरला आहे. शेतकरी तर याआधीही तण जाळत होतं. पण त्यावेळी इतकं प्रदूषण होत नव्हतं. यावर चिंतन करण्याची गरज आहे. यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. पाकिस्तान असा देश आहे की जो मुघलांवरही मात करत आहे. स्वत:ला नष्ट करण्याच्या मार्गावर ते राष्ट्र आहे. त्यामुळे आपण सावध राहायला हवं', असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
https://ift.tt/36IbWhF