
आग्रा: 'दिवार' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यावर दुश्मनाने मारलेली गोळी अमिताभ यांनी खिशात ठेवलेल्या बिल्ल्याला लागल्याने जीव वाचतो. असे चित्रपटातच होऊ शकते असे सर्वजण म्हणत असतात. मात्र, चटकन विश्वास बसत नसला, तरी अशी घटना प्रत्यक्ष घडलेली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात फिरोझाबादमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान हवालदार विजेंदर कुमार (२४) यांना नवा जन्म मिळाला आहे. शुक्रवारी फिरोझाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर झालेल्या गोळीबारादरम्यान एक गोळी विजेंदर कुमार यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या आरपार गेली आणि नाणी असलेल्या वॉलेटमध्ये ती गोळी अडकली. विजेंदर यांनी आपले वॉलेट जॅकेटच्या वरच्या खिशात ठेवले होते. यामुळे विजेंदर यांचा जीव वाचला. जेव्हा आंदोलन सुरू झाले तेव्हा विरेंदर एसपींच्या एस्कॉर्टमध्ये सहभागी होते. आंदोलनाने हिंसक रूप धारण पोलिसांचा गोळीबार सुरू झाला. यावेळी विजेंदर यांचे सहकारी धर्मेद्र यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. हा माझा दुसरा जन्म असून मी देवाचा खूपच आभारी आहे, अशी प्रतिक्रिया विरेंदर यांनी व्यक्त केली आहे. वॉलेटमध्ये ठेवली होती भगवान शिवाचा फोटो आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. मला या हिंसक जमावाला रोखायचे होते. याचवेळी एक गोळी माझ्या छातीवर लागली. माझ्या बुलेटप्रूफ जॅकेटने मला या गोळीपासून वाचवले नाही. मात्रस माझ्या वॉलेटमध्ये भगवान शिवाचा फोटो आणि काही पैशांची नाणी ठेवली होती, त्यामुळे मात्र माझे प्राण वाचले, असे विजेंदर यांनी माहिती देताना सांगितले. ४० पोलीस कर्मचारी झाले जखमी फिरोझाबादमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये ४० पोलीस कर्मचारी जखमी झाले. याच पोलीस ठाण्याचे प्रमुख, पोलीस उप निरीक्षक आणि हवालदारांचा समावेश आहे. हिंसक जमाव पोलिसांवर गोळीबार करत होता अशी माहिती फिरोझाबादचे पोलीस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी दिली. या गोळीबारात जखमी झालेल्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना उपचाराच्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येतील असे पटेल यांनी सांगितले.