नागपूर: शिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ (भाजपची निवडणूक निशाणी) फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील संयुक्त सत्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावरील चर्चेत आदित्य आपले विचार मांडत होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. नाव न घेता केला भाजपवर हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा निशाणा भाजपवरच होता. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. हे जनतेने निवडलेले सरकार नसून राजकीय हाराकिरीने सत्तेवर आलेले सरकार आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे भाजपवर पलटवार केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्नेहभोजन देण्याचा अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच घडला असल्याचे संबंधित शासकीय अधिकारी म्हणाले.