
चेन्नई: 'संसदेत बहुमत मिळवले म्हणजे आपल्या देशाची सामाजिक घडी विस्कटविण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असं समजू नका' असं म्हणत अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक यांनी पुन्हा एकदा नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र डागलंय. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलन पेटलं असताना बॉलिवूडचे कलाकारदेखील या कायद्याविरोधात आपली मतं मांडताना दिसत आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. 'संसदेत बहुमत मिळवले म्हणजे आपल्या देशाची सामाजिक घडी विस्कटविण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असं समजू नका. नागरिकत्व कायद्यानंतर आता ''चं खुळ त्यांच्या डोक्यात आहे. दस्तऐवजांच्या आधारावर किंवा त्याअभावी आपण एखाद्या व्यक्तीचे देशातील अस्तित्व सिद्ध करू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही. ही दडपशाही संपेपर्यंत माझा लढा संपणार नाही. ' अशा शब्दात त्यांनी सरकारी धोरणाचा निषेध केला आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अभिनेते कमल हासन यांनी जोरदार निषेध केला होता. 'विद्यार्थ्यांविरोधात पोलिसी बळाचा वापर म्हणजे लोकशाहीच्या तोंडात मारण्यासारखं असून त्यामुळं लोकशाही 'आयसीयू'त असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे,' अशी तोफ त्यांनी डागली होती. कमल हासन यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन तामिळनाडू सरकारवरही टीका केली होती. 'हे सरकार त्यांच्या धन्यांशी बांधील आहे. त्यांचे बोलविते आणि करविते धनी कोण आहेत हे वेगळं सांगायला नको,' असंही ते म्हणाले. भारतीय घटनेची पायमल्ली करणारे हे विधेयक भारतीय स्वातंत्र्याचे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वरूप नष्ट करण्याच्या उद्देशानेच आणले गेले आहे, असा दावा करत देशभरात या कायद्याविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. कमल हासन यांच्या 'मक्कल नीधी मय्यम' पक्षानं नव्या नागरिकत्व कायद्याला न्यायालयात आव्हानही दिलं आहे. या कायद्याच्या विरोधात आमची लढाई सुरूच राहील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.