मुंबई: इराकला जाणाऱ्या ११० यात्रेकरुंना रोखले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 12, 2020

मुंबई: इराकला जाणाऱ्या ११० यात्रेकरुंना रोखले

https://ift.tt/2tdnCtJ
मुंबई: अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका इराकला जाणाऱ्या यात्रेकरुंनाही बसला आहे. मुंबईहून इराकला जाणाऱ्या ११० यात्रेकरुंना मुंबई विमानतळावरच रोखण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव या यात्रेकरुंना इराकला जाण्यास मनाई करण्यात आली असून हे सर्व प्रवासी दाऊदी बोहरा समाजातील आहेत. दाऊदी बोहरा समाजातील हे सर्व यात्रेकरू इराकमधील पवित्र स्थळाच्या दर्शनासाठी निघाले होते. शनिवारी हे यात्रेकरु मुंबई विमानतळावर इराकमधील नजफला जाणारं विमान पकडण्यासाठी आले होते. यापैकी पाच जणांनी त्यांचं इमिग्रेशन क्लिअरही केलं होतं. इतर जण बोर्डिंग पास घेऊन इमिग्रेशन क्लिअर करण्यासाठी रांगेत उभे होते. मात्र विमानतळ प्रशासनाने वेळीच या सर्वांना इराकला जाण्यास मज्जाव केला. भारतीयांसाठी इराकला जाणं सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नाही. अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराकला जाऊ नका, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर बोर्डिंग पास देणं बंद करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. ८ जानेवारी रोजीच परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं होतं. इराकला जाणाऱ्या यात्रेकरुंना इमिग्रेशन क्लिअरन्स देणं बंद केल्याचं या आदेशात म्हटलं होतं. पुढचा आदेश येईपर्यंत ईसीआर आणि ईसीएनआर पासपोर्ट होल्डरांना इराकसाठी तात्काळ क्लिअरन्स देण्यात येणार नाही, असं या आदेशात नमूद करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचे कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार मारले होते. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी इराणने इराकमधील अमेरिकेच्या मिलिट्री तळांवरही हल्ला चढवला होता. यावेळी युक्रेनचं विमानही पाडण्यात आलं होतं. मात्र, विमान पाडणं ही आमची चूक होती, अशी कबुलीही इराणने दिली होती.