
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप सातत्यानं रखडत असल्याबद्दल शिवसेनेचे नेते, खासदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'खातेवाटप हा काही मोठा गंभीर विषय नाही. त्यासाठी इतका वेळ लागणं चुकीचं आहे. 'तारीख पे तारीख' देणं हे काही बरोबर नाही,' असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडं बोट दाखवलं. 'सत्तारांनी राजीनामा का दिला, मला माहीत नाही,' असं ते म्हणाले.