'ऑक्सिजनची नळी मोदी फेकून देणार नाहीत' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 4, 2020

'ऑक्सिजनची नळी मोदी फेकून देणार नाहीत'

https://ift.tt/2TjTiYs
मुंबई: 'आपले पंतप्रधान मोदी () हे अभिनयनिपुण आहेत. ते कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही. सोशल मीडिया सोडण्याची त्यांची घोषणा याचाच एक भाग होती. पण सोशल मीडियाचं व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. सोशल मीडिया सोडण्याचा माझा विचार आहे, असं ट्विट मोदींनी परवा केलं होतं. त्यानंतर मंगळवारी दिवसभर चर्चा सुरू झाली. राजकीय विरोधकांनी त्यावर टोलेबाजी केली तर मोदी समर्थकांनी त्यांना हा निर्णय न घेण्याची गळ घातली. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून () तिरकस शब्दांत भाष्य करण्यात आलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> खरंतर ‘सोशल मीडिया’ हा तर भाजपचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली. पण भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला. नाट्य पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले. >> आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात मोदी पटाईत आहेत. साडेपाच कोटींपेक्षा जास्त लोक मोदी यांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. मोदींचे फेसबुक पान पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचते. इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून मोदी रोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सर्वकाही सोडण्याचा निर्णय मोदी घेतीलच कसा? कारण सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच. >> इतके ‘फॅन फॉलोइंग’ सोडून मोदींनी सोशल मीडियातून संन्यास घेणे म्हणजे भांडवलशहा अमेरिकेने कम्युनिस्टांचा साम्यवाद स्वीकारण्यासारखेच होते! >> सोशल मीडियाचा वापर हा एक छंद आहे. स्त्रियांना नटण्या-मुरडण्याची हौस असते. कुणाला छानछोकीची हौस असते, कुणाला उत्तम खाण्यापिण्यात आनंद मिळतो. तसा मोदी यांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात आनंद मिळत असतो. >> आपलीच चर्चा सदैव व्हावी व आपल्यावरच कॅमेऱ्यांचा झोत राहावा याकडे त्यांचा कटाक्ष असतो. सोशल मीडियावर यासाठीच ते सक्रिय राहतात. त्यामुळेच सोशल मीडियापासून दूर होण्याच्या काही तासांच्या अफवेवरील धूळ झटकून मोदींनी उलट जागतिक महिला दिनी देशातील निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी नवी शक्कल लढवली. >> एक मात्र खरे की सोशल मीडिया म्हणजे समाजाचे दिशादर्शक नाही. भाजपच्या सायबर योद्ध्यांनी झारखंड गमावले. दिल्लीत मोठ्या सायबर फौजा उतरवूनही भाजपचा पराभव झाला. ‘सीएए’ला विरोध करणारे कसे देशद्रोही आहेत असा प्रचार सोशल मीडियावर करूनही लोकांनी जुमानले नाही. सोशल मीडियावरचा लोकांचा विश्वास उडत चालल्याचे हे लक्षण आहे. >> वास्तविक सोशल मीडियाचा सकारात्मक वापरही करता येतो हे अलीकडे रतन टाटांसारख्या लोकांनी दाखवून दिले. एका सफाई कामगाराच्या मुलाची व्यथा टाटा यांनी सोशल मीडियातून लोकांसमोर आणली. सोशल मीडियात असे कामही होते. त्यामुळे सोशल मीडिया सोडण्याच्या काही तासांच्या अफवेऐवजी मोदी यांनी टाटांचा मार्ग स्वीकारावा. पण तसे केले तर त्यांच्या सायबर योद्धय़ांचे काय होईल? >> फौजा तर शेवटी पोटावरच चालतात आणि आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे त्या फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. काही तासांच्या अफवेचा एवढाच अर्थ आहे.