मुंबई: 'भारतीय जनता पक्ष व त्यांचे लोक गेल्या पाचेक वर्षांपासून छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेत आहेत व आता तर ‘पंतप्रधान मोदी हेच शिवाजी महाराज’ अशी पुस्तके छापून वाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळं ते नक्की कोणाचे वंशज आहेत हे त्यांनी सांगायला हवं,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं (ShivSena) केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष () यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही टीका केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी औरंगाबादचा दौरा केला. त्यावेळी आम्ही शिवरायांचे व संभाजी महाराजांचे वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही, असं म्हणत नामांतराची मागणी केली. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपना हा मुद्दा लावून धरल्याची चर्चा त्यानंतर लगेचच सुरू झाली. त्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून () भाष्य करण्यात आलं आहे. नामांतराची मागणी करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना 'दादामियां' अशी उपमा देण्यात आली आहे. 'भाजपला आता हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा जो पुळका आलाय तो का आणि कशासाठी हे लोकांना चांगलं कळतं. बाळासाहेब ठाकरेंनी २५ वर्षांपूर्वीच औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. त्यामुळं आता त्यांनी औरंग्याची कितीही पिशाचे उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही,' असं शिवसेनेनं ठणकावलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती. >> महाराष्ट्रात भाजपच्या वागण्या-बोलण्याला तसा काही अर्थ उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे राज्यातील मंडळी सध्या जे बोलतात आणि करतात त्यात त्यांचे वैफल्यच दिसून येते. चंद्रकांत पाटील सुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळ्यास लावीत आहेत. त्यांचा आवेश आणि जोर पाहता या मंडळींची फक्त जीभच सटकली आहे असे नाही, तर बरेच काही सटकले आहे असं दिसतं. >> पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. मग पाच वर्षांत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का करू शकला नाहीत? तिकडे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या झटक्यात वाराणसीचे प्रयागराज केले. इतरही नावे-गावे बदलली. त्यांना कोणीच अडवले नाही. मग फडणवीस यांना औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करायला कोणाची परवानगी हवी होती? >> कधी वीर सावरकर तर कधी ‘संभाजीनगर’, कधी आणखी काही. भाजपनं हे विषय फक्त राजकारण तोंडी लावायलाच घेतलेत. ना मुंबईत छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाची एक वीट रचली, ना वीर सावरकरांना भारतरत्न दिले. तिकडे अयोध्येतही श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने. >> महाराष्ट्रात भाजपचे घोडे हे अजूनही मोगलांप्रमाणे सरळ पाणी प्यायला तयार नाहीत. विरोधी पक्ष म्हणजे फक्त लाथा झाडायला आणि हवे तसे बेताल बोलायलाच उरला आहे काय? असा प्रश्न लोकांना पडत आहे.