coronavirus : गर्दीपासून दूर राहा; सरकारचा सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 7, 2020

coronavirus : गर्दीपासून दूर राहा; सरकारचा सल्ला

https://ift.tt/2PW9u09
नवी दिल्ली : जगभरातली करोनाच्या बळींची वाढती संख्या लक्षात घेता भारत सरकारनंही करोनाची धास्ती घेतलीय. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शुक्रवारी सगळ्याच राज्यांना मोठ्या सभा आणि संमेलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. वेगवेगळ्या संस्था आपापल्या स्तरावर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या देशात करोनाबाधितांची संख्या ३१ वर आहे.

उल्लेखनीय म्हणजे, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरससंबंधी एक मोठा निर्णय घेत यावर्षी होळीचा कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही कोणत्याही प्रकारच्या होळी कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून याबद्दल एक सूचना जारी करण्यात आलीय. जागतिक स्तरावर Covid-19 रुग्णांच्या संख्येनं एक लाखांचा आकडा ओलांडलाय तर जगभरात करोना व्हायरसनं मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ३४११ वर पोहचलीय. मात्र, भारतात अद्याप करोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. ५ मार्चपर्यंत संपूर्ण भारतात २९,६०७ जणांची करोना चाचणी करण्यात आलीय. भारतात सापडलेल्या ३१ करोनाबाधितांपैंकी ३ रुग्ण राजधानी दिल्लीत सापडलेत. करोनाचा नुकताच समोर आलेला रुग्ण दिल्लीच्या उत्तम नगरचा रहिवासी असलेला एक २५ वर्षांचा तरुण आहे. यापूर्वी आढळलेला रुग्ण गुरुग्राममधल्या एका कंपनीचा कर्मचारी आहे. हा रुग्ण २५ फेब्रुवारी थायलंड आणि मलेशियाचा प्रवास करून परतला होता. या रुग्णावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर ११ जणांना त्यांच्या घरी वेगळं ठेवण्यात आलंय. यामध्ये या रुग्णाची पत्नी, भाऊ, वहिणी आणि दोन मुलं यांचा समावेश आहे.