करोना संकट: ६५ हजार कोटींची गरज-राजन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 30, 2020

करोना संकट: ६५ हजार कोटींची गरज-राजन

https://ift.tt/3aM3GxT
नवी दिल्ली : करोना रोखण्यासाठी भारताला किमान ६५००० कोटींची गरज आहे, असे मत माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. आता लाॅकडाऊन उठवण्याबाबत ठोस निर्णय घेऊन दैनंदीन जीवन सुरळीत करण्याला सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असे राजन यांनी सांगितले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी राजन यांनी व्हिडिओ चॅटमधून संवाद साधला. देशात करोना बळींची संख्या एक हजारांवर गेली आहे. करोना रोखण्यासाठीचा देशव्यापी लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपणार आहे. करोनामुळे होणाऱ्या अर्थसंकटाशी कशा प्रकारे सामना करावा याबाबत गांधी यांनी राजन यांच्याशी संवाद साधला. राजन म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था २०० लाख कोटींची आहे. त्यापैकी ६५००० कोटी हे गरिबांच्या अन्नपुरवठ्यासाठी वापरायला हवेत. करोनाने साऱ्या जगासमोर आव्हान उभं केलं आहे. करोना रोखण्यासाठी नियमांपलिकडे जाऊन कामं करावं लागेल. सरकारला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी व्यापक विचार करावा लागेल. लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्याला चालना देण्यासाठी सरकारने प्राधान्यक्रम ठरवून उपाययोजना कराव्यात, असे राजन यांनी सुचवले. आणखी एक लाॅकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल, असे इशारा त्यांनी दिला. बाजारपेठ पुन्हा खुली केल्याने करोनाबाधीतांची संख्या शुन्य होईल, हे समजणं चुकीचे आहे, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्वाचे राहील, असे राजन यांनी सांगितले. नजिकच्या काळात चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. करोनाच्या संकटकाळात जागतिक बाजारपेठेला पुरवठा करणारे केंद्र बनण्याची संधी भारताला आहे, असे त्यांनी सांगितले.