नगरमध्ये क्वारंटाइन तरुणांचे ‘वर्क फॉर आपली शाळा’ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2020

नगरमध्ये क्वारंटाइन तरुणांचे ‘वर्क फॉर आपली शाळा’

https://ift.tt/2LVfMdL
अहमदनगर: शाळेत व्हावे लागेल म्हणून मुंबई-पुण्यातून लोक गावात यायला घाबरत आहेत. तर कोणी गावात राजकीय वजन वापरून शाळेत राहणे टाळण्यात यशस्वी होत आहेत. मात्र, राहाता तालुक्यातील येथे उच्च शिक्षित तरुणांनी शाळेत राहणे पसंतच केले नाही, तर शाळेचे रुपडेही पालटून टाकले आहे. पुण्या-मुंबईतून गावात आल्यावर शाळेत क्वारंटाइन झालेल्या काही तरुणांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ करून वेगळा संदेश दिला आहे. लोणी बुद्रुक गावात १७ नागरीकांना उर्दू शाळा व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विभागणी करून क्वारंटाईन केलेले आहे. हे तरुण मूळचे याच गावातील असून विविध शहरांत चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत. सध्या शाळेतूनच ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. मात्र, त्यांनी जेवण, कपडे, स्वच्छतागृह अशा तक्रारींना दुय्यम स्थान देत शाळा स्वच्छतेचा निर्णय घेतला आणि कामाला सुरवात केली. उपलब्ध साधने वापरून त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. झाडांना वाफे बनविणे, झाडांना पाणी घालणे, शाळा खोल्या धुऊन स्वच्छ करणे अशी कामे करत छोटीशी बागही फुलविली. ‘आम्ही याच शाळेत शिकलो. नोकरीला लागलो, शहरात गेलो, क्वारंटाइनमुळे नकळत आम्हाला या ज्ञान मंदिराच्या स्वच्छतेचे पाईक होण्याची संधी मिळाली,’ असे एका तरुणाने सांगितले. त्यांची उमेद पाहून ग्रामपंचायतीनेही स्वच्छतेसाठी गरजेचे असलेले साहित्य त्यांना पुरविले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांची राहण्याची व्यवस्था, झोपण्यासाठी गादी, वीज पुरवठा, फॅन, सॅनिटायझर, रोज औषध फवारणीचीही व्यवस्था करण्यात आली. सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास आधिकारी कविता आहेर यांनी त्यांना मदत आणि प्रोत्साहन दिले.