जळगाव: लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही राज्यातील रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. आणि नाशिकमध्ये आज एकूण २९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात जळगावमधील १४ आणि नाशिकमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. अमळनेरमधील ७८ करोना संशयितांचे स्वॅब नुमने घेण्यात आले होते. त्याचे अहवाल आले आहेत. यापैकी ६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रूग्ण हे अमळनेर शहरातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ११४ इतकी झाली असून त्यापैकी आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. तर नाशिकमध्येही गेल्या १२ तासांत १५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नाशिकमधील रुग्णांची संख्या ४१वर गेली आहे. तर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ५३६वर पोहोचली आहे. नाशिकमधील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र, आता मालेगावपाठोपाठ नाशिकमध्येही करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये आज सापडलेल्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच ते राहत असलेला परिसर सील करण्यात येणार आहे. या शिवाय या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.