औरंगाबाद: औरंगाबादमधील रुग्णांची संख्या काही थांबताना दिसत नाही. आज आणखी २४ रुग्ण सापडल्याने करोना रुग्णांची संख्या ६५१वर पोहोचली आहे. औरंगाबादेत करोनामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण करोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. आज सापडलेले सर्व रुग्ण हे कंटेन्मेंट झोनमधील असून संपर्कातून त्यांना करोना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये काल ६९ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यात ८ मुलं आणि ९ मुलींचा समावेश होता. तर ५ मुले ही १० वर्षांपेक्षा कमी वयाची होती. रविवारीही औरंगाबादमध्ये ५० नवे रुग्ण आढळले होते. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन अंकी संख्येत करोनाचे रुग्ण सापडत असल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, काल राज्यात १ हजार २३० नेव रुग्ण सापडले असून राज्यातील रुग्णांची संख्या २३ हजार ४०१वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ५८७ रुग्ण करोनावर मात करून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ हजार ७८६ करोनामुक्त झाले आहेत.