IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 6, 2026

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असं

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या मनात भीतीचं वातावरण होतं. कारण या मैदानात आरामात धावांचा पाठलाग होतो, हे सर्वांना माहिती होती. पण संजू सॅमसनच्या 89 धावांच्या जोरावर भारताने 253 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 254 धावा दिल्या. यामुळे गोलंदाजांना थोडं बॅकअप मिळालं. कारण या खेळपट्टीवर 200 धावा आरामात गाठू शकतो अशी स्थिती आहे. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे धावांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. खरं तर एक वेळ अशी आली होती की भारताच्या हातून हा सामना वाळूसारखा निसटत आहे. त्यामुळे मैदानात भयाण शांतता होती. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार बसतो अशी स्थिती होती. त्यामुळे इंग्लंडची धावगती वेगाने पुढे सरकत होती.

इंग्लंडकडून जेकॉब बेथेल आणि विल जॅक्स ही जोड जमली होती. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. कारण इंग्लंडने 13 व्या षटकात 160 धावांचा पल्ला गाठला होता. पुढच्या 7 षटकात काय होईल याचा अंदाज क्रीडाप्रेमींना येत होता. त्यामुळे हळूहळू मैदानातील प्रेक्षक वर्ग शांत होत होता. काही जणांनी रक्तदाब वाढत असल्याने टीव्ही बंद केला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने 14वे षटक वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे सोपवलं. या षटकात चमत्कार घडला. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 0, चौथ्या चेंडूवर 2, पाचव्या चेंडूवर 1 धावा काढली. सहावा चेंडू टाकताना अर्शदीपने सलग तीन वाइड टाकले. त्यामुळे क्रीडाप्रेमींना गोलंदाजांवर किती प्रेशर आहे याचा अंदाज आला. अर्शदीपने चौथ्यांदा सहावा चेंडू टाकला आणि विल जॅक्स जोरात षटकाराच्या दिशेने मारला. पण अक्षर पटेल वाऱ्याच्या वेगाने धावत आला आणि चेंडू पकडून आत फेकला. हा झेल पकडण्यात शिवम दुबेने चूक केली नाही आणि विकेट मिळाली.

विल जॅक्सच्या बाद होणं किती महत्त्वाचं होतं याचा अंदाच प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रिएक्शनवरून येतो. हा झेल पकडताच गौतम गंभीर टाळ्या वाजवत उभा राहिला. हा सामन्याचा टर्निंग प्वाइंट ठरला. कारण यानंतर धावगतीला ब्रेक मिळाला आणि टीम इंडियाने सामना सावरण्यास सुरुवात केली. शेवटच्या 30 धावांची आवश्यकता इंग्लंडला होती. पण इंग्लंडने 22 धावा केल्या आणि सामना 7 धावांनी गमावला.