'त्या' १६ जणांची नोंद करोना बळींच्या यादीत करा: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 9, 2020

'त्या' १६ जणांची नोंद करोना बळींच्या यादीत करा: शिवसेना

https://ift.tt/3duYAHX
मुंबई: 'औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले १६ स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची 'अपघाती' म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा,' अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. लॉकडाऊन सातत्यानं वाढत असल्यामुळं जालन्यातून काही स्थलांतरित मजूर मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे निघाले असताना शुक्रवारी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलंय. केंद्र सरकारनं व रेल्वे प्रशासनानं आता अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीच्या घोषणा झाल्या आहेत. पण गेलेल्या जीवांचं काय?, स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत सरकारनं नेमकं केलं काय?,' असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. करोनामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ‘लॉकडाऊन’ केलं, पण मजूरवर्ग लॉकडाऊनमध्ये एक तर उपासमारीने मरत आहे, नाहीतर अशा पायदळ प्रवासात चिरडून किंवा दमून मरत आहे. हे सुद्धा करोनाचे आणि लॉकडाऊनचे बळी आहेत. रेल्वेखाली चिरडून मारल्या गेलेल्या मजुरांना करोना संक्रमणाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना थंडी भरून ताप आला नाही. त्यांना सर्दी-खोकला नव्हता. त्यांना श्वास घेण्यास अडथळे नव्हते. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत व त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी सरकारवरच येते. रोजच्या रोज करोनाच्या नव्या मृतांचे आकडे प्रसिद्ध होत असतात. त्यात या १६ जणांचा समावेश व्हायला हवा,' असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.