जळगाव: राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी ४९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आणि औरंगाबादमध्ये आज ४९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यापैकी जळगावमध्ये ३२ तर औरंगाबादमध्ये १७ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या १०३ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापैकी ७१ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील कंटेन्मेंट झोनमधील अंदारपुरा, कसाली, मरीमाता मंदिर, मढी चौक येथे हे ३१ रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्या ३२ रुग्णांमुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १५७ इतकी झाली असून त्यापैकी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. तर औरंगाबादमध्येही आज १७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात संजय नगरमध्ये ६, कटकट गेट आणि भवानी नगरात प्रत्येकी २, बाबर कॉलनी ४, आसेफिया कॉलनी, रामनगर, सिल्क मिल कॉलनी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच यात १० महिला आणि ७ पुरुषांचा समावेश असून आज १७ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४९५ झाली आहे.