मुंबई: करोनाच्या संकटाशी निकराची झुंज देणाऱ्या मुंबईला यंदा पुराच्या संकटाचाही सामना करावा लागण्याची भीती आहे. पाऊस सुरू होण्यास अवघा महिना राहिला असताना मुंबईतील नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. लॉकडाऊनच्या काळात कामगार मिळत नसल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेचे नवे आयुक्त यांनी सोमवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि माहीम येथे जाऊन मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामाची पाहणी केली. मुंबई शहराबरोबरच पूर्व व पश्चिम उपनगरातून वाहणाऱ्या मिठी नदीतून दरवर्षी १.३ लाख मेट्रिक टन गाळ काढला जातो. यंदा हे काम आतापर्यंत २९ टक्के पूर्ण झाले आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी ७० टक्के काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 'कोविड १९'च्या संकटाचा फटका महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांना बसू नये याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना केल्या आहेत. नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे करण्यासाठी गरज भासल्यास कामगारांना दोन शिफ्टमध्ये कामाला लावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असला तरी नगरसेवकांना वेगळीच चिंता भेडसावत आहे. नालेसफाई करण्यासाठी व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना मजूरच मिळत नाही. त्यामुळं यंदा कामांचा वेग खूपच कमी असल्याचं काही नगरसेवकांचं म्हणणं आहे.