Air Force : शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; वायू सेना प्रमुख कडाडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 20, 2020

Air Force : शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; वायू सेना प्रमुख कडाडले

https://ift.tt/2AQTtUI
हैदराबाद : भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी चीनला जाहीरपणे इशारा दिला आहे. भारतीय वायू सेना अगदी शॉर्ट नोटीसवरही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे. आपलं सामर्थ्य दाखवून दिलेलं आहे आणि ते पुन्हा दाखवून देऊ, असं ते म्हणाले. हैदराबादमध्ये भारतीय वायू सेना अकादमीच्या पासिंग आऊट परेडला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गलवान खोऱ्यातील शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला. संबोधनाच्या सुरुवातीलाच आरकेएस भदोरिया यांनी शहीद कर्णल संतोष बाबू आणि त्यांच्या टीमच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. एका उंच रणभूमीवर अनेक आव्हाने असताना त्यांनी शौर्य दाखवून दिलं आणि देशाच्या अखंडतेची रक्षा केली. विविध करार असतानाही चीनकडून एलएसीवर करण्यात आलेल्या कारवाईनंतरही आपण शांततापूर्ण मार्गाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत, असं हवाई दल प्रमुख भदोरिया म्हणाले. आपण ज्या परिस्थितीत देशासोबत राहतो, त्याची मूळ गरज हीच असते की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सज्ज असावं. याच तयारीची छोटीशी झलक नुकतीच लडाखमध्ये पाहिली गेली, ज्यातून हे दिसतं की कशा प्रकारे कोणत्याही शॉर्ट नोटीसवर लढण्यासाठी वायू दल सक्षम आहे, असंही हवाई दल प्रमुख म्हणाले. मी पूर्ण देशाला आश्वस्त करतो की कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य सज्ज आहे आणि आपल्या जवानांचं बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी देशाला दिलं. हवाई दल प्रमुख हैदराबादला पोहोचण्याच्या एक दिवस अगोदरच भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आणि चॉपर्सने सीमेवर गस्त घालणं सुरू केलं होतं. लडाखमधील स्थिती पाहता आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत, असं हवाई दलाने स्पष्ट केलं होतं. दरम्यान, नुकतंच भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी लेह आणि श्रीनगर येथील वायू दल तळांना भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल हाय अलर्टवर आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यासोबतच्या सुरक्षा बैठकीनंतर भदोरिया यांनी त्यांचा लेह आणि श्रीनगर दौरा सुरू केला. हवाई दलाचे शक्तीशाली लढाऊ विमाने लडाख आणि परिसरात तैनात आहेत.