बीजिंग: भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता कायम राखून सीमावादावर चर्चेतूनच तोडगा काढला जाईल व त्यासाठी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये यापूर्वी झालेल्या बैठकीतील सहमतीच्या मुद्द्यांचा आधार घेतला जाईल, असे चीनने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारीच दोन्ही देशांतील द्विपक्षीय करारांचा हवाला देत, लष्करी व राजनैतिक चर्चेतूनच सीमावाद सोडवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीननेही शांततेचा पुकारा केला आहे. पूर्व लडाखमध्ये झालेल्या लष्करी वादातून दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांचे लष्करी जवान सीमेवर तळ ठोकून आहेत. दोन दिवस लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही कोंडी फोडण्यासाठी बैठका होत आहेत. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुन्यिंग यांनी सोमवारी या परिस्थितीची माहिती देत शांततेचा राग आळवला. '६ जून रोजी चीन व भारताच्या कमांडर दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चीनच्या क्षेत्रातील चोसुल मोल्दो भागात बैठक झाली व त्यांनी सीमेवरील सध्याच्या वादाबाबत सल्लामसलत केली. अलीकडे सीमेवरील अशा तणावाच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांच्या राजनैतिक व लष्करी पातळीवर घनिष्ठ संपर्क प्रस्थापित झाला आहे. त्यातूनच दोन्ही देशांदरम्यान अशा परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मतैक्य निर्माण झाले आहे. यातील एक सर्वमान्य तोडगा म्हणजे दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेल्या बैठकीतील सहमतीच्या मुद्द्यांचा आधार घेतला जाईल. वाचा: चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दोन अनौपचारिक परिषदा झाल्या. यामध्ये दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी शांतता व स्थिरता निर्माण करण्यासाठी दोन्ही बाजूच्या लष्कराने परस्परांमध्ये अधिक विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे आदेश दिले होते', याकडे चुन्यिंग यांनी लक्ष वेधले. दोन्ही दश एकत्र येतील व सीमेवर शांतता व स्थिरता निर्माण करून चांगले वातावरण घडवण्याचा प्रयत्न करतील. सीमेवरील परिस्थिती सामान्य व नियंत्रणात असून, संबंधित वादाचे मुद्दे सोडवण्यासाठी दोन्ही बाजू परस्परांशी चर्चेचा मार्ग अवलंबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाचा: लष्करी संवाद अयशस्वी पूर्व लडाखमध्ये दोन्ही लष्करी जवान समोरासमोर आल्याने मोठा संघर्ष टाळण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. भारतातर्फे लेहस्थित १४ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग व चीनतर्फे तिबेट लष्करी विभागाचे कमांडर मेजर जनरल लिऊ लिन यांच्यामध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळपर्यंत चर्चा झाली. मात्र, या प्रदीर्घ चर्चेतून ठोस असे काहीच निष्पन्न झाले नव्हेत. त्यानंतर राजनैतिक स्तरावरच हा प्रश्न पुढे नेण्यात आला. आणखी वाचा: