औरंगाबाद: राज्यात करोनाचा कहर वाढल्याने करोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अनेक ठिकाणी तर लोक स्वत:हून सरकारच्या प्रयत्नात खारीचा वाटा उचलताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये एका सोसायटीतील लोकांनी चक्क गणेशोत्सवासाठी जमा केलेल्या वर्गणीतून कोविड बांधलं आहे. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. औरंगाबादच्या ब्ल्यू बेल्स सोसायटीने हे काम केलं आहे. या सोसायटीने या आयसोलेशन सेंटरला 'आत्मनिर्भर कोविड आयसोलेशन सेंटर' असं नाव दिलं आहे. २० खाटांचं हे आयसोलेशन सेंटर आहे. आम्ही सर्वांनी गणपती उत्सवासाठी गोळा केलेली वर्गणी आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. ज्यांना करोना व्हायरसची लक्षणे नाहीत किंवा ज्यांना सौम्य लक्षणे आहेत आणि ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, अशा लोकांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन सचिन कारवा यांनी दिली. आयसोलेशन सेंटर बनविण्यासाठी आवश्यक नियम आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच हे सेंटर निर्माण करण्यात आलं आहे. या सेंटरमुळे रुग्णालयांवरील ताण कमी होईल. गंभीर लक्षणे नसलेल्या पण इंटेन्सिव्ह केअरची गरज असलेल्या लोकांसाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल, असं डॉ. दीपक कारवा यांनी सांगितलं.