
मुंबई : 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी,' 'शिक्षणाच्या आयचा घो,' 'एक हजाराची नोट',' रंगा पतंगा', 'टाईमपास २', 'देऊळबंद' यांसारख्या एकाहून एक सरस अशा सिनेमांमध्ये आणि 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हे एकपात्री नाटकात काम करून अभिनेता ने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी २१ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट दिवशी संदीपने मायानगरी मुंबई गाठली होती. मराठवाड्यातील माजलगावच्या या संदीपने अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आपल्या अथक मेहनतीने त्याने ते पूर्णही केले. आज यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला आल्यानंतर संदीपला आजही २१ वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो. याच आठवणींना त्याने शब्दबद्ध केले आहे. ही पोस्ट संदीपने सोशल मीडियावर शेअर केली. या आठवणींना उजाळा देताना संदीपने 'त्या दोन गोष्टींची' आवर्जून आठवण काढली. संदीपने लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. काय लिहिले आहे संदीपने अभिनेता संदीप पाठकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, '१४ ॲागस्ट या दिवशी मला मुंबईत येऊन २१ वर्ष पूर्ण होत आहेत. २१ वर्षापूर्वी ज्या यश्टी (एस.टी.) ने मी माजलगावहून मुंबईला आलो ती ही यश्टी, जी सुटकेस मी घेऊन आलो ती मी अजून जपून ठेवली आहे. त्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि ठरवलं की जसा मी तेव्हा आलो त्याच श्टाईल मधे फोटो काढूया.' 'जी स्वप्नं माझ्या डोळ्यांत होती ती मुंबईने पूर्ण केली. काम, प्रसिद्धी, पैसा, समाधान सगळं काही या शहराने दिलं. माझ्यासारखे हजारो मुलं, मुली ग्रामीण भागातून या मुंबानगरीत येतात आणि हे शहर त्यांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी २४ तास जागं असतं. खरंतर तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे, चाहत्यांमुळे मी आहे. आपल्यातील हे अंतर कमी व्हावं म्हणून मी एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय, नव्या रंगात नव्या ढंगात...काय आहे ती गोष्ट? तुम्ही अंदाजे सांगू शकाल?' असे सांगत आपल्या चाहत्यांसाठी काही तरी नवीन गोष्ट घेऊन येत असल्याचे सूतोवाच केले आहे. संदीपने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्यावर कमेन्ट करायला सुरुवात केली आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सतेज पाटील यांनीदेखील संदीपने ट्विटवर शेअर केलेली ही पोस्ट रिट्विट करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे. संदीपच्या या पोस्टवर अभिनेता स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, उमा हृषिकेश, गायक मंगेश बोरगावकर आदींनी कॉमेन्ट केल्या आहेत.