
प्रगती बाणखेले मुंबई- या घडीला देशाच्या लोकसंख्येमध्ये पुरुष संख्येच्या तुलनेत अपेक्षित असलेल्या तब्बल ४.६ कोटी महिला ‘नाहीशा’ झालेल्या आहेत, असे धक्कादायक वास्तव युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या आज, मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०२०’ अहवालातून समोर आले आहे. सध्या जगभरात प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चात होणाऱ्या लिंगनिवडींमुळे १४.२ काेटी महिलांचे अस्तित्वच पुसून टाकण्यात आले असून या कृत्यांत भारताचा क्रमांक वरचा आहे. लोकसंख्येमध्ये एक हजार मुलग्यांमागे ९४३ ते ९५२ मुली हे प्रमाण सामान्य मानले जाते. पण २०१६ ते २०१८ या दरम्यान देशात मुलींचे प्रमाण एक हजार मुलग्यांमागे ८९९ मुली इतके झाले आहे. मुलींचे लिंग गुणाेत्तर ९००पेक्षा कमी असलेल्या राज्यांत महाराष्ट्रही असून बिहार, हरयाणा, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब यांच्या पंक्तीत राज्याचा समावेश होतो. प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चात लिंगनिवडीमुळे जगाच्या नकाशावरून अस्तित्व पुसलेल्या महिलांची संख्या गेल्या पाच दशकांत दुप्पट झाली आहे. त्यापैकी २०१३ ते २०१७ या कालावधीत प्रसूतिपूर्व लिंगनिवडीमुळे दर वर्षी सरासरी १२ लाख मुली जन्मालाच येऊ शकल्या नाहीत. या कालावधीत भारतात ही संख्या दरवर्षी सरासरी ४ लाख ६० हजार एवढी आहे. म्हणजे जगाच्या लोकसंख्येतून मुली ‘नाहीशा’ करण्यात भारताचा वाटा एक तृतियांशपेक्षाही मोठा आहे. भारतात नाहीशा झालेल्या तीन मुलींमधील दोन मुली प्रसूतिपूर्व लिंगनिवडीमुळे ‘हरवल्या’ आहेत, असे हा अहवाल सांगतो. प्रसूतिपश्चात लिंगनिवडीतही पुढे जन्मल्यानंतर वयाच्या पाच वर्षांपर्यंत होणारे मुलींचे मृत्यू हे प्रसूतिपश्चात लिंगनिवडीमध्ये समाविष्ट होतात. या मृत्यूंचे प्रमाण भारतात सर्वाधिक म्हणजे १००० महिलांमागे १३.५ इतके आहे. भारत आणि चीनचा इथे मात्र एकविचार... जगाच्या लोकसंख्येतून हरवलेल्या मुलींच्या संख्येत चीन आणि भारतामधून नाहीशा झालेल्या मुलींचा आकडा सर्वाधिक आहे. या मुलींपैकी तब्ब्ल ५० टक्के मुली चीनमधून, ४० टक्के मुली भारतातून तर केवळ १० टक्के मुली जगाच्या उर्वरित भागामधून नाहीशा करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मुलींचे नाहीसे होणे हे चिंताजनक आणि अस्वीकारार्ह आहे. मुलग्याला प्राधान्य आणि लिंगाधारित निवडीमुळे ही स्थिती उद्भवली आहे. अधिकारांची असमान वाटणी, रचना आणि मूल्य रचना बदलणे तसेच मुली आणि महिलांना सन्मानाची वागणूक यातून हे शक्य होईल. आपल्याला समानता, स्वायत्तता आणि निवडीचे स्वातंत्र्य यावर आधारित जगाकडे वाटचाल करण्याची गरज आहे. अर्जेंटिना मटाव्हेल, यूएनएफपीएच्या भारत प्रतिनिधी