
मुंबई: काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईसह ठाण्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार कोसळत असल्याने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मात्र, आज रविवार असल्याने आणि पोलिसांनी विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुरू केल्याने आज मुंबईत तुरळक वाहतूक सुरू होती. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्यानंतरही मुंबईत वाहतूक कोंडी झाली नाही. आज सकाळी ८ वाजल्यापासूनच पावसाने पुन्हा एकदा मुंबई-ठाण्यात जोर धरला. वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला होता. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अवघ्या तासाभरातच मुंबईतील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. आजही हिंदमाता, वडाळ्याचा पंचायत रोड, धारावी क्रॉस रोड, काळाचौकीतील सरदार हॉटेल परिसर, माटुंग्याला एसआयईएस कॉलेज, भायखळा पोलिस ठाणे, चेंबूर पुलाखाली, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळ पाणी साचले होते. मात्र, आज रविवार असल्याने मुंबई-ठाणेकर घरातच राहिल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही. पावसामुळे कुर्ला बैलबाजार येथे झाड कोसळले असून यात कोणतीही हानी झाली नाही. दुपारी लाटा उसळणार दरम्यान, आज दुपारी समुद्राला मोठी भरती येणार आहे. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समुद्रात ४,६३ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच समुद्र किनारी जाऊ नये, असं आवाहनही मुंबईकरांना करण्यात आले आहे. सकाळपासून सुरू झालेला जोरदार पाऊस आणि त्यातच दुपारी समुद्राला भरती येणार असल्याने मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत २४ तासांत मुसळधार पाऊस होणार दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. कुलाबा वेधशाळेने मुंबईत १२९.६ मिलीमीटर आणि सांताक्रुझ वेधशाळेने २००.८ मिलीमिटर पावसाची नोंद केली आहे. दरम्यान, ठाण्यातही काल दिवसभरात २६५.१९ मिलीमीटर पाऊस पडला. ठाण्यात एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.