दुबई: दुबई-कालिकत हे एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळल्याचे वृत्त समोर आल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीयांना मोठा धक्का बसला. अनेकजण विमानतळावर केरळच्या प्रवासासाठी प्रतिक्षा करत होते. तर, काहीजणांचे नातेवाईक अपघातग्रस्त विमानात होते. अनेकांना रात्रीचा एक एक मिनिट अक्षरश: काही तासांसारखा भासू लागला होता. तर, दुसरीकडे भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचे फोन सातत्याने वाजत होते. विमान अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून १२७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. खलीज टाइम्ससोबत बोलताना सफन वडक्कन यांनी सांगितले की, माझी पत्नी आणि मुलं त्या विमानात आहेत. ते सुरक्षित असतील अशी अपेक्षा आहे. मला जितके हेल्पलाइन व इतर संपर्क क्रमांक मिळाले त्या सर्वांवर संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. काही वेळेनंतर अधिकाऱ्यांनी ते सुखरूप असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही त्यांच्याशी बोलणं न झाल्यामुळे चिंतेत आहे. माझ्यासाठी एक एक मिनिटंही तासाभरासारखा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. वडक्कन यांच्या भावाची पत्नी आणि तीन मुलेही या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. वाचा: केरळचे नागरीक असलेले मुनीर यांच्या कुटुंबियांची अशीच व्यथा आहे. मुनीर यांची वहिनीदेखील याच विमानात होती. मुनीर यांचा भाऊ आणि कुटुंबिय चिंतेत आहे. वहिनींच्या प्रकृतीबाबत काहीही समजले नाही. गुरुवारी आम्ही एकत्र जेवण केले. केरळमधील आपल्या घरी जाण्यासाठी वहिनी उत्सुक होती. हेल्पलाइन क्रमांकावरही सातत्याने संपर्क साधला जात आहे. मात्र, कोणतीही ठोस माहिती सांगितली जात नसल्याचे मुनीर यांनी सांगितले. वाचा: शारजा येथून आपला पती अंशद यांना भेटून पुन्हा केरळमध्ये जात असलेल्या शाहीना विमान अपघातानंतर फक्त आपल्या मुलांना शोधत होती. शाहीनाचा पासपोर्ट आणि मोबाइल हरवला. मात्र, त्यांच्या कुटुंबियातील एका सदस्याने रुग्णालयात त्यांना शोधले. अंशदने गोल्फ न्यूजला सांगितले की, माझी पत्नी व मुलं सुखरूप असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आमचे नातेवाइक रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना माझी भेटली. तर, माझ्या जुळ्या मुलांवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. आता, सर्वांना एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावासाने हेल्पालाइन क्रमांक जारी केले आहेत. भारताचे महावाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी सांगितले की, +९७१५६५४६३९०३, +९७१५४३०९०५७२, +९७१५४३०९०५७५ हे हेल्पालाइन क्रमांक सुरू आहेत. भारतीय दूतावासाकडून शक्य तेवढी मदत देण्यात येत आहे.